विकास आराखड्याबाबत हरकतींसाठी मुदत वाढ दिशाभूल करणारी

नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते दशरथ भगत यांचा आरोप

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, १४ ऑक्टोबर २०२२

नवी मुंबई महानगरपालिका, सिडको आणि एमआयडीसी प्रधिकरण यांचा समन्वय नसल्याने पालिकेकडून प्रसिध्द करण्यात आला शहर विकास आराखडा वादात सापडला आहे. या प्रारुप विकास आराखडयावर नागरिकांच्या हरकती व सूचनांना पालिकेने ३१ ऑक्टोंबर २०२२ची मुदत दिली आहे. मात्र ही मुदत वाढ खोटी आणि दिशा भूल करणारी आहे. पालिकेकडून हा मुदत वाढीचा केवळ दिखावा केला जात असल्याचा आरोप पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि नवी मुंबई बचाव अभियातातून जनजागृती करणारे दशरथ भगत यांनी केला आहे. पालिकेचे नवे आयुक्त राजेश नार्वेकर यांची दशरथ भगत यांनी भेट घेऊन मुदत वाढ ही कशी दिशाभूल करणारी आहे यांचा पाढा वाचला. तर पालिकेला शहराचा विकास करायचा आहे की? बिल्डरांचा? असा सवालही भगत यांनी उपस्थित केला.

२९ वर्षानंतर नवी मुंबईकरांच्या नागरी सोयी सुविधांची पुर्तता करणारा  प्रारुप विकास आराखडा पालिकेने प्रसिध्द केला आहे. हा प्रारुप विकास आराखडा लोकसहभागातून निर्माण व्हावा या विषयी जनतेला योग्य माहिती देऊन सूचना व हरकतीनंतरच त्याला अंतिम स्वरुप द्यावे या मागणीसाठी पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या माध्यमातून नवी मुंबई बचव जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी १२ हजार नागरिकांनी आपल्या सूचना व हरकती, मागण्या अभियानात लिखित स्वरुपात मांडल्या आहेत.

  • दरम्यान महापालिकेने हरकती व सूचनां सादर करण्यात ३१ ऑक्टोंबर पर्यतची मुदत देत असल्याचे जाहिर केले. मात्र हरकत व सूचनांना देण्यात आलेला एकुण ६० दिवसांमध्ये ऑगस्ट महिन्यातील चार शनिवार व रविवार सुट्टया आणि चार सार्वजनिक सुट्टया, सप्टेंबर महिन्यात आलेले चार शनिवार-रविवार सुट्टीचे दिवस त्याच प्रमाणे ऑक्टोंबर महिन्याती दोन रविवार-शनिवार सुट्टीचे दिवस, एक सार्वजनिक सुट्टी असे २५ दिवस वगळयास ३५ दिवस वास्तवात कामकाजा करीता आले असल्याचे भगत यांनी आयुक्त नार्वेकर यांच्या निदर्शनास आणून दिले. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दसरा आदी सणांची धामधूम सुरू असताना मुदत वाढीचा गवगवा केल्याचे भगत यांचे म्हणणे आहे. नवी मुंबई बचाओ अभियानात वारंवार मागणी करुनही नागरिकांमध्ये आराखडयाबाबत जनजागृती न केल्याने जनतेला अंधारात ठेऊन हा आराखडा निर्माण केला जात असल्याचा आरोप भगत यांनी केला आहे. याबाबत पालिकेने आतापर्यत काय काय केले, कुठे कुठे जनजागृती केली याची माहिती द्यावी, अशी मागणी भगत यांनी केली आहे.