रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी पत्रकारांचे साखळी आंदोलन, दोषींवर कारवाईची मागणी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • रायगड, ९ नोव्हेंबर २०२२

चौपदरीकरणाचे काम रखडल्याने मुंबई- गोवा महामार्गाची कमालीची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे या महामार्गाचे काम त्वरीत सुरू करावे या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी मुंबई गोवा महामार्गावर कोलाड नाका येथे मानवी साखळी आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधून घेतले. मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त, ज्येष्ठ पत्रकार एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन करण्यात आले. मंजुरीनंतर 11 वर्षे रखडलेल्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची उच्चस्तरीय समिती गठीत करून चौकशी व्हावी आणि दोषी ठेकेदार, अधिकारी व संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. पत्रकार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला.

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार एस एम देशमुख यांच्यासह मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, माजी अध्यक्ष गजानन नाईक,  माजी कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर, जिल्हा पत्रकार संघाचे नागेश कुलकर्णी,  माजी अध्यक्ष अभय आपटे, विजय मोकल, अनिल भोळे आदी उपस्थित होते. तर आमदार अनिकेत तटकरे, शिवसेना रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे, रोहा सिटीझन फोरमचे अध्यक्ष नितीन परब, आप्पा देशमुख आदींसह विविध सामाजिक संघटनांनी यावेळी उपस्थित राहून आंदोलनात आपला पाठिंबा दिला. यावेळी पोलिसांची मोठी कुमक बोलावण्यात आली होती. साडेअकरा वाजता महामार्गावर मानवी साखळी करण्यात आली. अर्ध्या तासाने महामार्गाचे प्रकल्प संचालक यशवंत व्होटकर हे रोहा तहसीलदार कविता जाधव यांच्यासमवेत आंदोलनस्थळी आले, चौपदरीकरणाचे कामाबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

दरम्यान, पुढील एक महिन्यात मुंबई गोवा महामार्ग सुस्थितीत न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, कोकणातील पत्रकार पुन्हा रस्त्यावर उतरून शासनाला जाब विचारतील असा इशारा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी यावेळी दिला.