अमली पदार्थांची तस्करी समूळ नष्ट करणार 

गृहराज्यमंत्री रणजीत पाटील

मुंबई, 7 मार्च 2017/AV News Bureau:

अमली पदार्थांच्या तस्करीची पाळेमुळे शोधून ती समूळ नष्ट केली जातील. याबाबत राष्ट्रीय गुन्हे शाखेकडून कारवाई होत असून कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.

अमली पदार्थांच्या तस्करांकडून मुंबई, पुणे तसेच राज्यातील इतर महत्वाच्या शहरांत शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जाण्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य बाबुराव पाचर्णे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.  विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य अजित पवार आदींनी चर्चेत सहभाग घेतला होता. यावेळी पाटील यांनी उत्तर दिले.

कोकेन आणि हेरॉईनइतकेच आरोग्याला अपायकारक असलेले म्यॉव म्यॉव किंवा एमडी असे तुलनेने स्वस्त पदार्थ विकण्यासाठी तस्करांनी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लक्ष्य केले. तथापि, या तस्करीसंदर्भात नॅशनल क्राईम ब्युरोने कारवाई करून आंतरराज्यीय स्तरावर सुरू असलेले जाळे तोडून गुन्हेगारांना अटक केली आहे. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एनडीपीसी कायद्याअंतर्गत १० ते २० वर्षे शिक्षा तसेच एक ते दोन लाखांपर्यंत दंड अशा शिक्षेची तरतूद आहे.

  • तस्करी रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा

अमली पदार्थांची तस्करी समूळ नष्ट करण्यासाठी शासनाने स्वतंत्र यंत्रणा कार्यरत केली असून, पाच युनिट स्थापन केले आहेत. अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्यात आले असून, कायद्यानुसार कडक कारवाई करून लवकरच यावर नियंत्रण आणण्यात येईल, असेही  पाटील यांनी सांगितले.