विजयाचे श्रेय जनतेला

danave

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे

मुंबई, 23 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये भाजपाच नंबर वन राहिला असून पक्षाच्या यशाचे श्रेय राज्यातील जनतेचे आहे, असे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितले. राज्यात दहा महापालिका व २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या जबरदस्त यशाबद्दल मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात गुरुवारी जल्लोष करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांचा कार्यकर्त्यांनी सत्कार केला.

राज्यात महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भाजपा प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. दहापैकी आठ महापालिकांमध्ये भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मुंबईत व ठाण्यात भाजपाच्या जागांमध्ये भरघोस वाढ झाली आहे. सर्व जिल्हा परिषदांमध्ये भाजपाने गेल्या वेळेच्या तुलनेत अनेक पटींनी जागा जिंकल्या आहेत. अनेक जिल्हा परिषदांमध्ये भाजपाने बहुमत मिळवले आहे, असे त्यांनी सांगितले.

नगरपालिका निवडणुकीत तसेच महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकीतही विरोधकांनी नोटबंदीच्या विरोधात प्रचार केला. तरीही जनतेने भाजपाला पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटबंदीचा निर्णय देशाच्या हिताचा आहे, याची जनतेला खात्री पटली आहे. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीतील भाजपाचे यश म्हणजे नोटबंदीला पाठिंबा आहे, असेही ते म्हणाले.