मराठी भाषा संवर्धनाचे कार्य पुढे कायम राखूया- अतिरिक्त आयुक्त  संजय काकडे

  • अविरत वाटचाल नेटवर्क
  • नवी मुंबई, 31 जानेवारी 2023

पंधरवड्यात सादर झालेल्या भाषाविषयक विविध कार्यक्रमांतून प्रेरणा घेऊन मराठी भाषा व साहित्य संवर्धनाचे कार्य यापुढेही सतत सुरू राहिले पाहिजे. त्यासाठी मराठी भाषेत संवाद साधणे, मराठी पुस्तकांचे अधिकाधिक वाचन करणे तसेच मराठी भाषेतून लिखाण करण्याचा वसा आपण घेतला पाहिजे असे सांगत नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त  संजय काकडे यांनी शासन स्तरावरून मराठी भाषा संवर्धनासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांना प्रत्येक मराठी भाषिकाने स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेत साथ दिली पाहिजे अशा शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून मराठी भाषेचा गौरव करणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यामध्ये नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांचेकरिता आयोजित स्वकाव्यवाचन स्पर्धा व निबंध स्पर्धा यांच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांचेसमवेत भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी  करिश्मा नायर, प्रशासन विभागाचे उपआयुक्त  नितिन नार्वेकर, शहर अभियंता संजय देसाई, समाजविकास विभागाचे उपायुक्त  दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, भांडार विभागाचे उपआयुक्त  अनंत जाधव, स्वकाव्यवाचन स्पर्धेचे परीक्षक कविवर्य साहेबराव ठाणगे, निबंध स्पर्धेचे परीक्षक साहित्यिक संपादक राजेंद्र घरत आदी मान्यवर उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त  संजय काकडे यांनी मुलांनी आजच्या जगात सक्षमपणे उभे रहावे म्हणून इंग्रजी माध्यमातून त्यांना शिक्षण देण्याचे सार्वत्रिक चित्र आज घराघरांतून दिसून येते असे सांगत या परिस्थितीतही आपली मायबोली मराठी प्रचलित राहण्यासाठी घरात मुलांशी मराठीत बोलण्याची व त्यांच्यामध्ये इंग्रजीप्रमाणेच मराठी भाषेचीही गोडी वाढण्यासाठी पालकांमार्फत प्रयत्न व्हावेत असे मत व्यक्त केले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी भाषा जिवंत ठेवण्याची महत्वाची जबाबदारी आपली सर्वांची असल्याचे त्यांनी सांगितले.

नवी मुंबई महानगरपालिकेने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित केलेले कार्यक्रम इतरांपेक्षा वेगळेपण सिध्द करणारे होते व त्यामुळे त्याचे कौतुक शासनासह सर्व स्तरांतून झाले याचा विशेष उल्लेख त्यांनी केला.

सुप्रसिध्द कवी साहेबराव ठाणगे यांनी स्वकाव्यवाचन स्पर्धेत सादर झालेल्या 36 कवीच्या कवितांचे परीक्षण करून पूर्वसुरींच्या उत्तमोत्तम कवितांचे वाचन करण्याचा सल्ला दिला. निबंध वा लेखासारखी आडव्याऐवजी उभी लिहिली म्हणजे कविता होत नाही तर कमीत कमी शब्दांमध्ये आशय मांडण्याची ताकद कवितेमध्ये असते हे लक्षात घेत स्वत:ला व्यक्त करीत लिहीत राहिले पाहिजे असे त्यांनी सहभागी कवींना सांगितले. नवी मुंबई महानगरपालिकेने भषा संवर्धन पंधरवड्यात राबविलेले सर्वच उपक्रम लक्षवेधी होते असे सांगत त्यांनी आपल्या गाजलेल्या कवितांचे गाऊन सादरीकरण केले आणि उपस्थितांची मने जिंकली.

साहित्यिक संपादक  राजेंद्र घरत यांनी निबंध स्पर्धेचे परीक्षक म्हणून मनोगत व्यक्त करताना सर्वप्रथम 219 इतक्या मोठ्या संख्येने भरभरून सहभाग घेणा-या महापालिका कर्मचा-यांचे कौतुक केले. ‘पर्यावरण संवर्धन – माझी संकल्पना’ तसेच ‘जागर अभिजात मराठीचा’ या दोनपैकी एका विषयावर निबंध सादर करताना निदर्शनास आलेल्या त्रुटींवर त्यांनी खुसखुशीत अभ्यासपूर्ण भाष्य केले. या निमित्ताने आपण मराठी साहित्य वाचनाकडे वळलो याचा विशेष उल्लेख करीत स्वत:च्या सर्वांगीण विकासासाठी हे सातत्य कायम राखा असा सल्ला त्यांनी दिला.

निबंध स्पर्धेत 219 निबंधांमधून – लवेश पाटील यांनी प्रथम, सुहासिनी वाळुंज यांनी व्दितीय तसेच चित्रा बाविस्कर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. अनुजा खरसंबळे, लीना पाटील, डॉ. लालन पाटील, अनिता खैरनार, राहुल कांबळे, नारायण लांडगे यांना उत्तेजनार्थ पारितोषिकांनी मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानीत करण्यात आले.

स्वकाव्यवाचन स्पर्धेत 36 कवींमधून – पुष्पांजली कर्वे यांनी प्रथम, प्रवीण जाधव यांनी व्दितीय, पंकज बोराडे यांनी तृतीय क्रमांक संपादन केला. सानिका शेटे, कांचन माळी, चित्रा बाविस्कर, भावना पवार, अभय जाधव यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके पटकाविली. पारितोषिकेही प्रशस्तिपत्रे तसेच ग्रंथ स्वरूपात प्रदान करण्यात आल्याची विशेष नोंद घेण्यात आली. समाजविकास विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी आभार प्रदर्शन केले.

14 ते 28 जानेवारी या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिकेने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त राबविलेल्या विशेष लक्षवेधी उपक्रमांमुळे अधिकारी, कर्मचारीवृंद मराठी साहित्य वाचनाकडे वळून त्यांच्या व्यक्तिमत्त्वात व कामकाजात सकारात्मक बदल दिसतील असा विश्वास महानगरपालिकेच्या उच्च अधिका-यांनी व्यक्त केला आहे. तसेच या कार्यक्रमांच्या निमित्ताने आलेल्या मान्यवर वक्त्यांनी व कार्यक्रमास आलेल्या रसिक श्रोत्यांनीही महानगरपालिकेने राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक केले आहे. याशिवाय सर्वच कार्यक्रम फेसबुक लाईव्ह केल्याने सोशल मिडियावरून ऑनलाईन आस्वाद घेणा-या रसिकांनीही मोठ्या संख्येने लाईक्स व कमेंट्स करीत पसंतीची दाद दिलेली आहे.

=====================================

  • अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

=====================================

अविरत वाटचाल वर्तमानपत्र