नवी मुंबईकरांसाठी विभागनिहाय 6 ते 7 तास पाणीपुरवठा करण्याचा आराखडा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 20 ऑक्टोबर 2023

 नवी मुंबईकर नागरिकांना पुरेशा प्रमाणात समाधानकारक पाणीपुरवठा व्हावा याकरिता पाणी पुरवठयाचे सुयोग्य नियोजन करण्यात येत असून विभागनिहाय 6 ते 7 तास पाणीपुरवठा करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे व त्याची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. हे नियोजन प्रत्येक विभागातील जलकुंभ भरण्याच्या वेळांचे करण्यात आलेले आहे. नागरिकांना वितरित केले जाणारे पाणी सकाळी आणि संध्याकाळी पूर्वीप्रमाणेच केले जाणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

पूर्वी सकाळी आणि संध्याकाळी संपूर्ण नवी मुंबई क्षेत्रातील विविध विभागातील जलकुंभ एकाच वेळी भरले जात असल्याने पाण्याचा दाबाची समस्या जाणवत होती. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने जलवितरण प्रणालीचा  अभ्यास करून जलकुंभ भरण्याचे विभागनिहाय वेळापत्रक तयार केले. त्याची माहिती महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासमोर आढावा बैठकीत सादर करण्यात आली. या नवीन नियोजनानुसार सध्या पाणीपुरवठा प्रणाली राबविण्यास सुरूवात करण्यात आलेली आहे.

बातमी वाचा _: नवी मुंबई विमानतळ बाधितांसाठी सिडकोतर्फे भूखंडाचा ताबा दिल्यापासून ६ वर्षांचा बांधकाम कालावधी मंजूर

स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पामुळे जलसमृध्द शहर ही नवी मुंबईची ओळख असून यावर्षी 24 सप्टेंबर रोजी मोरबे धरण पूर्णपणे भरले आहे. 19 ऑक्टोबर रोजी मोरबे धरणातील जलसाठा 184.38 द.ल.घ.मी. म्हणजेच 96 टक्के इतका आहे.

मोरबे धरणातून प्रतिदिन 450 द.ल.लि इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. मोरबे धरणातील पाण्यावर भोकरपाडा येथील जलशुध्दीकरण केंद्रामध्ये शुध्दीकरण प्रक्रिया करण्यात येत असून त्याचीही क्षमता 450 द.ल.लि. इतकी आहे.

बातमी वाचा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांच्या काय असतात पात्रता व अपात्रता जाणून घ्या !

सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मोरबे धरणातून दररोज 450 द.ल.लि. आणि एम.आय.डी.सीच्या बारवी धरणातून 80 द.ल.लि. इतक्या प्रमाणात दैनंदिन पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. तथापि सध्या एम.आय.डी.सी कडून नवी मुंबई महानगरपालिकेस आवश्यक   असलेल्या दैनंदिन 80 द.ल.लि. पाणी पुरवठ्याऐवजी प्रत्यक्षात 60 ते 65 द.ल.लि. इतकाच पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

बातमी वाचा : लघुग्रह बेन्नू चा नमुना पृथ्वीवर

 त्यामुळे एम.आय.डी.सी कडून उपलब्ध्‍ होणारे पाणी शिळ येथील जलकुंभात घेऊन ज्या दिघा, ऐरोली व घणसोली विभागातील काही क्षेत्रात वितरित केले जाते. तसेच एम.आय.डी.सी भागातील नेरुळ येथील शिवाजीनगर, बोनसरी, इंदिरा नगर, गणपतीपाडा, महापेगाव, पावणेगाव त्याचप्रमाणे घणसोली विभागातील रबाळे, कातकरीपाडा, भीमनगर, आंबेडकरनगर, वाल्मिकीनगर तसेच ऐरोली विभागातील चिंचपाडा, यादवनगर, गवतेवाडी आणि संपूर्ण दिघा विभाग क्षेत्र याठिकाणी 33 थेट नळजोडणींव्दारे वितरीत केले जाते. त्या भागातील नागरिकांच्या अपु-या पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी येत आहेत.

एमआयडीसी क्षेत्रात असलेल्या झोपडपट्टी व गावठाण भागात एमआयडीसीमार्फत पाणी पुरवठा करण्यात येत असल्यामुळे सदर भागात पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यासाठी साठवण क्षमता वाढविण्याकरिता तुर्भे स्टोअर, हनुमान नगर, इंदिरानगर, गणपतीपाडा, कातकरीपाडा (भीमनगर) येथे नवीन जलकुंभ बांधण्याचे काम नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत हाती घेण्यात आले आहे.

बातमी वाचा : मीरा बोरवणकरांनी केलेल्या आरोपांची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीमार्फत चौकशी करा: नाना पटोले

परंतु सद्यस्थितीतीत सदर भागात एमआयडीसीकडून रात्रीच्या सुमारास अवेळी व अपु-या प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याबाबत तेथील नागरिकांच्या मोठया प्रमाणात तक्रारी येतात. त्याचप्रमाणे घणसोली व ऐरोली भागात शिळ एम.बी.आर. येथे एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने सदर भागाची तूट भरुन काढण्यासाठी मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीतून या भागासाठी अतिरिक्त पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

बातमी वाचा : अंदमान समुद्रातील ज्वालामुखी आर्क ऑफ-निकोबारबाबत संशोधन

ही परिस्थिती पाहता एमआयडीसीकडून होणा-या अपु-या पाणी पुरवठयात वाढ करण्यासाठी व या समस्येचे निवारण करण्याकरिता एम.आय.डी.सी कडून होणा-या अपु-या पाणी पुरवठयात वाढ करण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे सातत्याने विचारणा व पाठपुरावा सुरु असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर वरिष्ठ पातळीवरुन ही समस्या मार्गी लागण्यासाठी सतत पाठपुरावा करीत आहेत.

========================================================