इतिहास आणि जलसंवर्धन

  • स्वप्ना हरळकर/ अविरत वाटचाल
  • नवी मुंबई, 27 सप्टेंबर 2025

राज्यात ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि पुराणकाळापासून ज्यांच्या नोंदी सापडतात अशा ३,००० च्या वर बारव आहेत. या सगळ्यामध्ये ऐतिहासिक मूल्य सुद्धा आहेत. ज्या पद्धतीचं स्थापत्यशास्त्र वापरलं आहे, त्या स्थापत्यशास्त्राचा नमुना जगामध्ये दुर्मिळ आहे. जलसंवर्धन आणि जलसंधारण याचं कार्यही होतंय. त्या पाण्याची उपयोगिताही झाली पाहिजे. आणि म्हणून राज्यभरातल्या जिल्ह्यात असलेल्या या सगळ्या बारव आणि त्या बारवाच्या नोंदणी याची आवश्यकता लक्षात येते. म्हणून या बारव जतन, संवर्धन आणि उपयोगिता याची स्पष्ट उद्दिष्ट्ये आणि हेतूदर्शित केलेला नव्याने शासन निर्णय जारी करण्यात येणार आहे. राज्य सरकारने याबाबत येत्या तीन महिन्यांमध्ये यातला प्राथमिक सर्वेक्षणाचा राज्यातल्या सर्व बारवांच्या नोंदीचा स्पष्ट अहवाल येईल असंही स्पष्ट केलं आहे.

ऐतिहासिक विहीरी आणि बारव यांच्या संदर्भात घेतलेला या निर्णयांमुळे केवळ ऐतिहासिक पाऊलखुणा जपल्या जाणार नाहीत तर त्यासोबत जलसंवर्धनाचं कामही होणार आहे. बारव हा शब्द काहीजणांसाठी नवीन असेल तर बारव म्हणजे मोठी विहिर जिच्यात उतरणीला जिने किंवा मजले बांधलेले असतात. या जिन्यावरून उतरताना केलेलं कोरीवकाम, त्याच्यासाठी वापरलेली सामग्री हे तत्कालीन स्थापत्यशास्त्राच्या प्रभावी वापरण्याविषयी माहिती देतं.

जमिनीपासून साधारण वीस ते बावीस फूट खाली असलेल्या या बारव आणि त्यातले आजही जिवंत असलेले गोड्या पाण्याचे झरे कायम आहेत. पाण्याचे झरे शोधण्यासाठी आज आपण नवीन नवीन तंत्रज्ञान वापरतो मात्र त्या काळात कदाचित शेकडो वर्षांपूर्वी वापरत असलेली पध्दती किती प्रगत होती याची प्रचीती देते. पूर्वीच्या काळापासून जेव्हा जेव्हा माणसाने आपल्या वसाहती वसवल्या त्या पाण्याच्या काठावर किंवा जिथे पाणी उपलब्ध आहे तिथेच.

सर्वांनाच नदीच्या काठावर वसाहत करता येत नाही त्यांना पाण्याच्या इतर स्त्रोतांचा शोध घ्यावाच लागणार होता. त्यामुळे मग बारव, विहिरी, तळे अशा ठिकाणी वसाहती वसवल्या गेल्या. एक संपूर्ण इतिहास, समाजाच्या पध्दती याची माहिती आज कित्येक वर्षानंतरही सांगत हा ठेवा जिवंत आहे.

इतिहास आपल्याला भविष्याच्या दृष्टीने माहिती देत असतो त्यामुळे त्यातूनही शिकण्याचं काम होत असतं. त्या काळात पाण्याच्या साठ्यांना महत्व दिलं जात होतं. ज्याची महती आज आपल्याला समजत आहे. गाव असो किंवा शहर जवळपास सर्वांच्याच घरात पाण्याचे नळ आहेत त्यामुळे पाणी वाचवणं आणि ते साठवून ठेवण्याची पध्दती याचं भान राहिलं नाही. परिणामी केवळ बारवंच नव्हे तर गावातल्या, शहरातल्या अनेक विहिरी आज दुर्लक्षित झाल्या आहेत. जो निर्णय बारवांच्या संवर्धनासाठी घेतला गेला आहे तसाच निर्णय विहिरींसाठीही घेतला गेला तर गोड्या पाण्याचे अनेक साठे उपलब्ध होतील. आज अस्तित्वात असलेल्या शहराचा काही भाग हा पूर्वी ग्रामीण, गावातच मोडत होता. गावाचा विकास झाला आणि तिथे वसाहती निर्माण होऊन शहर उभं राहिलं. या गावाचा चेहरा बदलला पण काही ऐतिहासिक वास्तू आणि विहिरी, पाण्याचे स्त्रोत तिथेच राहिले. हे स्त्रोत जिवंतच आहेत गरज आहे ती केवळ बारव, विहीरी किंवा तळी स्वच्छ करून त्यांचा पुर्न वापर सुरू करण्याची. त्यासाठी हा ठेव्याची कागदोपत्री नोंद तर करावी लागेल कारण अशी नोंद असेल तर त्याचे संदर्भ मागे आणि पुढेही उपयोगी पडणार आहेत.

काही ठिकाणी नवीन रस्ता तयार करताना किंवा खोदकाम करताना विहीरी सापडतात, पाण्याचा झरा सापडतो याचा अर्थ या भागात गोड्या पाण्याचे साठे नक्कीच असतील. आपल्या भागात किमान आपण ज्या परिसरात राहतो तिथे असलेल्या विहिरी, तळी यांची माहिती घेण्यासाठी आपल्याला ऐतिहासिक पुरावे शोधावे लागत नाहीत. किमान त्यांची नोंद घेतली तरी ती माहिती एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जात असते. जलसाठा आणि जलस्त्रोतांचं संवर्धन हा भविष्यातला महत्त्वाचा दुवा असणार आहे. पाणी हे जीवन मानलं जातं कारण तहान तर लागतेच ती शमविण्यासाठी सर्व सजीवांना पाण्याची गरज लागते. अनेक भागांमध्ये दुष्काळाच्या काळात अशाच बारव, विहिरी यांच्यातल्या पाणी साठ्यावरच सजीवांचं जीवन अवलंबून राहिलं आहे. त्यामुळे असा हा ठेवा संरक्षित करून त्याची डागडुजी होणं हे आहे जेणेकरून त्याच्यातल्या पाणी साठ्याच्या वापर होईल आणि हा ठेवाही संरक्षित राहिल.

========================================================