- सिध्दार्थ हरळकर/अविरत वाटचाल
- नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत
युतीचा धर्म म्हणत महापौर, उपमहापौर निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने माघार घेत भाजपच्या उमेदवारांना बिनविरोध निवडून येण्यास मदत केली. मात्र आतापर्यंतची वाटचाल पाहता सभागृहात भाजप आणि शिवसेना यांच्यात चांगलीच झुंज पहायला मिळणार, अशी चर्चा आतापासूनच महापालिका वर्तुळात सुरु झाली आहे.
महापौरपदी निवड झालेल्या सुजाता पाटील या स्वभावाने शांत आणि संयमी असल्याचे बोलले जाते. त्यामुळे विरोधकांना थोपविण्यास त्या यशस्वी ठरतील का, अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र दुसरीकडे भाजपने दशरथ भगत सारख्या अनुभवी नगरसेवकाकडे उपमहापौरपदाची जबाबदारी देत महापौरांवरील ताण काहीसा कमी होईल, अशी व्यवस्था केलेली दिसते. याचा प्रत्यय सभागृहाच्या पहिल्याच दिवशी दशरथ भगत यांच्या भाषणातून आला. विशेष म्हणजे महापौरांपेक्षा दशरथ भगत यांची देहबोली आणि आवेश अधिक दिसून येत होता. त्यामुळे आगामी काळात महापौर सुजाता पाटील यांच्यापेक्षा उपमहापौर दशरथ भगत यांचाच सभागृहात अधिक प्रभाव जाणवेल अशीच चर्चा आता अधिकाऱ्यांमध्येही रंगली आहे. भगत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अशी मोठी पदे यशस्वीपणे सांभाळलेली आहेत. मात्र असे असतानाही दशरथ भगत यांना म्हणावी तशी मोठी राजकीय संधी अद्याप मिळालेली नाही. मात्र अडीच वर्षांसाठी का होईना पण उपमहापौरपदाने ती काही अंशी भरून निघाली असली तरी त्यांना भविष्यात आणखी मोठी संधी मिळण्याची गरज असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
नवी मुंबई महापालिकेत गेली पाच सहा वर्षे सुरु राहिलेल्या प्रशासकीय पद्धतीमुळे लोकप्रतिनिधी तसेच प्रशासन यांच्यात म्हणावा तसा सुसंवाद राहिलेला नाही. महापौर सुजाता पाटील तसेच उपमहापौर दशरथ भगत यांनी आपल्या पहिल्याच भाषणात प्रशासन काळातील कामकाजाबाबत प्रतिकूल मते व्यक्त केली आहेत. त्यामुळे आगामी काळात सभागृहात अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याव्यतिरिक्त विरोधकांनाही काबूत ठेवण्याचे आव्हान सत्ताधाऱ्यांसमोर खासकरून महापौर आणि उपमहापौर यांच्यासमोर असणार आहे. विरोधक आणि प्रशासन यांना थोपविण्याची जबाबदारी महापौर सुजाता पाटील यांच्यापेक्षा उपमहापौर दशरथ भगत यांच्यावर अधिक राहील, असे बोलले जात आहे.
भाजप नेते गणेश नाईक यांच्या नव्या फळीतील डॅशिंग आणि अनुभवी सहकाऱ्यांमध्ये दशरथ भगत यांचा वरचा क्रमांक लागतो. त्यांचा आक्रमकपणा सभागृहात सत्ताधारी भाजपला नक्कीच फायद्याचा ठरेल.तसेच दशरथ भगत यांच्या सोबतीला सागर नाईक, जयवंत सुतार, जयाजी नाथ, सुरज पाटील अशी वरिष्ठ नगरसेवकांची फळी असल्यामुळे विरोधकांना सभागृहात नक्कीच मोठा संघर्ष करावा लागेल, असेच काहीसे चित्र दिसेल असे वाटते.
========================================================




========================================================













