जनशक्ती भाजपच्या धनशक्तीचा पराभव करील

  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण

अविरत वाटचाल न्यूज

वानगाव, पालघर,24 मे 2018:

सत्ता आणि पैशाचा गैरवापर करून अनैतिक मार्गाने निवडणुका जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पण पालघरची स्वाभिमानी जनता भाजपच्या धनशक्तीचा पराभव करून प्रामाणिक आणि निष्ठावंत उमेदवार दामू शिंगडा यांना विजयी करील, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.

  • पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार दामू शिंगडा यांच्या प्रचारासाठी खा. अशोक चव्हाण आज पालघर जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. डहाणू तालुक्यातील वानगाव येथे सभेला संबोधित करताना ते बोलत होते. स्व. चिंतामन वनगा यांच्या नावाने भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष भांडत आहेत. भाजपने वनगा यांच्या मृत्यूनंतर वनगा परिवाराची उपेक्षा केली. भाजपला उमेदवार मिळत नव्हता म्हणून गावितांना पळवून नेऊन उमेदवारी दिली. गावितांचा पराभव समोर दिसत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री मंडळातील डझनभर मंत्री पालघर जिल्ह्यात फिरत आहेत, अशी टीका चव्हाण यांनी केली.
  •  गेल्या चार वर्षात सत्तेत आल्यापासून भाजपने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. मोदी आणि फडणविसांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने आदिवासींच्या विकास योजनांच्या निधीत मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. समृध्दी महामार्ग आणि बुलेट ट्रेनच्या नावाखाली गरीब शेतकरी आणि आदिवासींच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. फडणवीसांना पालघरच्या विकासापेक्षा मोदींच्या गुजरातच्या विकासाची जास्त चिंता आहे. फडणवीसांच्या भाषणबाजीला आता जनता भुलणार नाही. पालघर जिल्हा काँग्रेसला मानणारा जिल्हा असून माजी खा. दामू शिंगडा हेच आदिवासींच्या समस्यांची जाण असणारे प्रामाणिक आणि निष्ठावंत उमेदवार आहेत. भाजपकडे पैसा आहे तर काँग्रेसकडे माणुसकी आहे. दामू शिंगडा यांना विजयी करून भाजपच्या धनशक्तीला पराभूत करा असे आवाहन  खा. चव्हाण यांनी उपस्थितांना केले.