GST दर कमी करण्याचे श्रेय घेणा-या पंतप्रधानांनी आठ वर्ष वाढीव दराने केलेल्या लुटीची जबाबदारी घ्यावी: हर्षवर्धन सपकाळ

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई ,21 सप्टेंबर 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पुन्हा एकदा आपल्या सवयीप्रमाणे GST दर कपातीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. २०१७ मध्ये मोदीजींनीच स्वतः प्रचंड वाढीव दराने GST आणून देशातील उद्योग, व्यापारी आणि सामान्य नागरिक यांना त्रस्त केले, त्यांची प्रचंड आर्थिक लूट केली. तेच मोदीजी आज GST दर कमी केले म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. गेल्या आठ वर्षांत GST संकलन दुप्पट वाढून २२ लाख कोटींवर गेले आहे आणि याचा सर्वाधिक फटका ग्राहक व छोट्या व्यवसायांना बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दर कमी करण्याचे श्रेय घेताना आठ वर्ष वाढीव दराने केलेल्या लुटीची जबाबदारी ही घेतली पाहिजे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राहुल गांधी यांनी खूप आधीच सांगितले होते की मोदींजींनी GST ला गब्बर सिंग टॅक्स मध्ये परिवर्तित केले आहे. दर कमी करून जनतेची लूट थांबवा अशी मागणीही त्यांनी सातत्याने केली होती. त्यावर निर्णय घ्यायला मोदींनी काही वर्ष उशीर केला. पेट्रोल-डिझेलच्या दरांवर मात्र मोदीजी गप्प आहेत. जनतेला स्वदेशीचा उपदेश करणारे पंतप्रधान स्वतः परदेशी गाड्या, घड्याळे, पेन व फोन वापरतात. ‘आत्मनिर्भरते’ची शिकवण देताना स्वतः मात्र ऐषआरामी जीवनशैलीत गुंतलेले आहेत.

त्यांच्या आजच्या भाषणात उत्साह आणि आत्मविश्वासाची कमी होती. कदाचित देशभर घुमणारे “वोट चोर, गद्दी छोड”चे नारे आणि जनतेत वाढत चाललेली नाराजी याचेच ते प्रतिबिंब असावे. पंतप्रधानांनी लोकांची दिशाभूल करणाऱ्या भाषणांपेक्षा महागाई, बेरोजगारी, शेती व शेतक-यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.