शिवसेनेला पाठिंबा देऊ नये – कामत

gurudas kamat

मुंबई,25 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

मुंबई महापालिका निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मात्र सत्तास्थापनेसाठी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देऊ नये, असे मत काँग्रेस नेते गुरुदास कामत यांनी केले आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. या निवडणुकीत भाजपला 82 तर शिवसेनेला 84 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष सत्ता स्थापनेसाठी आक्रमक झाले आहेत. काही अपक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिला असला तरी सत्ता स्थापनेसाठी लागणारे संख्याबळ दोन्ही पक्षांकडे अद्याप जमा झालेले नाही. यापार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिवसेनेने आधी सत्तेतून बाहेर पडावे, मग पुढचा निर्णय आम्ही घेऊ,अशी भूमिका जाहीर केली होती. यामुळे मुंबई महापालिकेत शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र गुरुदास कामत यांनी शिवसेनेला कोणत्याही प्रकारचा पाठिंबा देण्यास आपला विरोध असल्याचे गुरुदास कामत यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

 

याबाबत पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही आपले मत कळविल्याचे कामत यांनी ट्वीट करून जाहीर केले.