शेतकरी कर्जमाफीसाठी चांदा ते बांदा संघर्ष यात्रा काढणार

मुंबई  23 मार्च 2017/AV News Bureau:

शेतकरी कर्जमाफीबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याने विरोधी पक्ष आता रस्त्यावर उतरणार असून, 29 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह विधिमंडळातील सर्वच विरोधी पक्ष चांदा ते बांदा राज्यव्यापी संघर्ष यात्रा काढणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.

विधानसभेत शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या 19 आमदारांना 31 डिसेंबर 2017 पर्यंत निलंबीत करण्यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव मांडला होता. ही सरकारची दडपशाही  आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि सरकारकडून सुरू असलेल्या मुस्कटदाबीच्या विरोधात विरोधी पक्षांनी रस्त्यावर उतरण्याचे निश्चित केले आहे. या यात्रेचा विस्तृत कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल, असेही या नेत्यांनी सांगितले.

या संदर्भात तत्पूर्वी झालेल्या विरोधी पक्षांच्या आमदारांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, दोन्ही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे आणि इतर राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.