तळोजात 5 घरे जळून खाक

नवी मुंबई, 10 एप्रिल 2017/AV News Bureau:

तळोजा येथील एम आय डी सी लगत असलेल्या चिंध्रण  या गावातील ५ घरे जळून खाक झाली. सायंकाळी 7 च्या सुमारास ही घटना घडली आहे.या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

तळोजा एमआयडीसी परिसरातील चिंध्रण गावात राहणाऱ्या शंकर जगे यांच्या घरात सायंकाळी सातच्या सुमारास ही आग लागली. थोड्याच वेळात आगीने रौद्र रुप धारण केले आणि क्षणात आग आजुबाजूच्या घरांना लागली. या आगीत जगे यांच्या घरासह आजुबाजूची पाच घरे जळून खाक झाली. आगीमुळे घरातील सामानही जळून गेले. मात्र आग लागताच घरातील सर्व मंडळी बाहेर गेल्यामुळे कोणासही इजा झाली नाही. आगीचे वृत्त मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.