डबक्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

नवी मुंबई,10 मे 2017/AV News Bureau:

मासेमारीसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात पोहोण्यासाठी उतरलेल्या दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना नवी मुंबईच्या ऐरोलीत घडली आहे. काल सायंकाळी ही दुर्घटना घडली.

घणसोली येथील चिंचाळी भागात राहणारे हितेश प्रेमकुमार सत्री (12) आणि युवराज दिलबहादूर थापा (15 ) हे दोन मुले काल सायंकाळी घणसोली न्यू डेपोजवळील खाडी किनारी असलेल्या पाण्याच्या डबक्यामध्ये आंघोळीसाठी गेली होती. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघे बुडाले. खाडी किनारी गाडी धुण्यासाठी आलेल्या काही लोकांना दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्याच्या डबक्यात आढळून आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून दोन्ही मुलांना पाण्याबाहेर काढले. दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरिक्षक कणसे यांनी दिल. याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षक अधिक तपास करीत आहेत.