सर्वोच्च न्यायालयाचा कारभार पेपरलेस

नवी दिल्ली, 10 मे 2017/AV News Bureau:

सर्वोच्च न्यायालयानेही आता डिजिटल होण्याचा निर्णय घेतला असून आजपासून पेपरलेस म्हणजेच कागदविरहीत कामकाजास प्रारंभ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत एका समारंभात डिजिटल फायलिंग प्रणालीचे उद्घाटन केले. यावेळी सरन्यायधीश जगदीश शिंह खेर उपस्थित होते. ही डिजिटल फायलिंग प्रणाली सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळाशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित कामकाजाची माहितीही काही क्षणात उपलब्ध होणार आहे.

ई गव्हर्नस सरळ आणि प्रभावी प्रणाली आहे. त्यामुळे वेगाने विस्तारणाऱ्या आणि विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचा देशाच्या विकासासाठी फायदा करून घेणे आवश्यक आहे. उज्वल भारतासाठी तंत्रज्ञानाबरोबरच मतप्रवाहदेखील बदलणे गरजेचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

सरन्यायाधीस जगदीश सिंग खेर यांनी डिजिटल प्रणालीचे स्वागत केले आहे. कागदविरहीत कामकाजाला प्रोत्साहन देणाऱ्या या प्रणालीशी देशातील 24 उच्च न्यायालये आणि इतर कनिष्ठ न्यायालयेही जोडण्यात यावी, अशी सूचना करीत तंत्रज्ञानाच्या मदतीने न्यायिक प्रक्रियेत अधिकाधिक पारदर्शकता निर्माण करून गैरव्यवहार टाळता येऊ शकतील, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.