प्रलंबित प्रकरणे ३ दिवसांत सोडवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई, 15 मे 2017/AV News Bureau:

सामान्य नागरिकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रशासनाने लोकशाही दिनाची वाट पाहू नये. यापूर्वीच्या लोकशाही दिनातील प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर तीन दिवसांत कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिकाऱ्यांना दिले.

मंत्रालयात आज ऑनलाईन लोकशाही दिन झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मंत्रालयात ऑनलाईन लोकशाही दिनामध्ये 23 प्रकरणांवर सुनावणी करण्यात आली. यापूर्वीच्या लोकशाही दिनातील प्रलंबित असलेल्या प्रकरणावर तीन दिवसांत कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

सामान्य नागरिकांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी लोकशाही दिनात दाद मागण्याची गरजच पडता कामा नये. प्रशासनाने स्थानिक पातळीवर ते वेळेवर निकाली काढावे.

  1. मुंबई साकीनाका येथील गुलाटी कंपाऊंड येथील रवि रामधनी यादव व त्यांच्या बहिणीचे घर अधिकाऱ्यांनी विकासकाशी संगनमत करुन बेकायदेशीररित्या तोडल्याबाबत तक्रार यावेळी करण्यात आली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले.
  2. श्रीमती चंद्रभागा दशरथ सोनटक्के, मु. फळवणी, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांना कोर्टाचे आदेश होऊनही जमिनीचा ताबा मिळाला नसल्याबाबतची तक्रार केली होती. याबाबत मुख्यमंत्र्यांनी श्रीमती सोनटक्के यांना तीन दिवसांतच जमिनीचा ताबा देण्याचे निर्देश संबंधितांना दिले.
  3. बुटी बोरी एमआयडीसी, नागपूर येथे गोपाल सिरोया यांना प्रकल्पासाठी जागा मिळत नव्हती. त्यांना तत्काळ जागा देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले.

आजच्या लोकशाही दिनात पुणे, नागपूर, बीड, रायगड, सांगली, जळगाव, यवतमाळ, परभणी, सिंधुदूर्ग, चंद्रपूर, सोलापूर, अकोला, अहमदनगर, औरंगाबाद, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारींचा समावेश होता.