आषाढी यात्रेसाठी एसटीच्या  3 हजार 687 गाड्या

मुंबई,1 जुलै 2017/AV News Bureau:

पंढरपूर येथे  4  जुलै रोजी होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी एसटीने तब्बल 3 हजार 687 जादा बसेस सोडल्या आहेत. भाविक प्रवाशांच्या सोयीसाठी ग्रुप बुकिंग, अडव्हान्स बुकिंग तसेच प्रत्यक्ष बसस्थानकावर करंट बुकिंगची सुविधा प्राप्त करून देण्यात आली आहे.

राज्याच्या विविध भागांतून आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक पंढरपूर येथे दाखल होतात. त्यापैकी बहुतांश भाविक पायी दिंडीने येतात. पण आषाढी यात्रा झाली की, व्दादशीला म्हणजे ५ तारखेला अनेक भाविक परतीच्या प्रवासासाठी एसटी बसने निघतात. या भाविकांच्या सोयीसाठी पंढरपूर येथे मुख्य बसस्थानकातून काही अंतरावर तात्पुरते स्थानक उभारून तेथून या जादा बसेस विभाग निहाय सोडण्यात येणार आहेत.

  • भाविकांसाठी सुविधा

या नव्या स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी प्रसाधनगृहे, उपाहारगृहे, विश्रांती कक्ष, झुणका-भाकर केंद्र, अखंडित वीज पुरवठा, स्वछ पाणी या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

  • विभाग निहाय फलाट

नवीन बसस्थानकातून मराठवाडा, विदर्भ, खान्देश, कोकण व पश्चिम महाराष्ट्रात विभाग निहाय फलाट निर्माण करण्यात आले असून भाविक प्रवाशांनी परतीच्या प्रवासासाठी येथून मार्गस्थ व्हावे. तरी भाविक प्रवाशांनी एसटीच्या सुरक्षित  सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.