रवी शास्त्री भारतीय क्रिकेट संघाचे कोच

मुंबई, 12 जुलै 2017/AV News Bureau:

भारतीय क्रिकेट संघाचा  मुख्य कोच  म्हणून रवी शास्त्री यांची निवड झाली आहे. तर  बॉलिंग कोच म्हणून तेज गोलंदाज झहीर खानची निवड झाली आहे. मंगळवारी उशिरा शास्त्री यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय कोचच्या निवडीबाबतच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

‘कोच’ साठी भारताचा स्फोटक फलंदाज विरेंद्र सहवाग आणि माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्यामध्ये रस्सीखेच  होती. शास्त्रीच्या नावाला कोहलीचा पाठिंबा होता. तर बीसीसीआयच्या सल्लागार समितीचा सदस्य आणि माजी कर्णधार सौरव गांगुली शास्त्रीची निवड करण्यास फारसा उत्साहीत नव्हता. मात्र कोहलीच्याच पसंतीला मान्यता मिळाल्याचे शास्त्री यांच्या निवडीवरून स्पष्ट झाले आहे.

भारताचा माजी विश्वविक्रमी गोलंदाज अनिल कुंबळे यांनी कोहलीशी मतभेद झाल्यानंतर सरळ  कोच पदाचा राजिनामा दिला होता. कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली भारतीय क्रिकेट संघाने भरीव कामगिरी केली होती. यामुळे कोहलीवरही टीका झाली होती. मात्र कुंबळेने कोचपदाचा राजिनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी नव्याने शोधाशोध सुरू होता.

भारतीय क्रिकेट संघाच्या कोचपदासाठी माजी कसोटीपटू रवी शास्त्री, तडाखेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग, क्रेक मॅकडरमॉट,लांस क्लूजनर,राकेश शर्मा, लालचंद राजपूत. फिल सिमंस,टॉम मूडी,डोडा गणेश,रिचर्ड पाइब्ज आदींची नावे पुढे आली होती. त्यातही सेहवाग आणि शास्त्री यांच्यात मुख्य कोचपदासाठी स्पर्धा होती. मात्र कर्णधार विराट कोहलीने शास्त्री यांच्या नावाला पसंती दिली होती. याप्रकरणी बीसीसीआयच्या सल्लागार समितीचे सदस्य माजी कर्णधार सौरव गांगुली, माजी कसोटीपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर यांनी कोहलीशी चर्चा केल्यानंतर शास्त्री यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे आगामी श्रीलंका दौऱ्यापासून शास्त्री भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारतील. 2019 च्या विश्वचषकापर्यंत रवी शास्त्री आणि झहीर खानची नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी कर्णधार राहुल द्रविडला भारतीय संघाच्या महत्वाच्या दौऱ्यांसाठी फलंदाज सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.