- पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची माहिती
अविरत वाटचाल न्यूज
मुंबई, 6 जून 2018:
प्लास्टिक बंदीनंतर शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खतांवर बंदी आणण्याबाबत गांभिर्याने विचार सुरु असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित जागतिक पर्यावरण दिन सोहळ्यातील पर्यावरण विषयक पारितोषिक वितरण कार्यक्रमात कदम बोलत होते.
- संपूर्ण जगाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील जनतेलाही प्लास्टिकच्या परिणामांची जाणीव झाली असून नागरिक स्वत:हून प्लास्टिकच्या कॅरी बॅगचा त्याग करुन कापडी पिशव्या वापरु लागले आहेत. नद्या, समुद्र, समुद्र किनारे प्लास्टिकच्या वस्तुने भरले आहेत. त्याचा परिणाम मानवी जीवनाबरोबरच जैवविविधतेवर होत आहे. कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढले आहे. तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. शेतीत वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांमुळे अन्न धान्यामध्ये विषारी घटकांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कुटुंबातील अनेकांना वेगवेगळे जीव घेणे आजार जडले आहेत. म्हणूनच प्लास्टिक बंदीनंतर आता रासायनिक खते वापरण्यावरही बंदी आणण्यासाठी पर्यावरण विभाग विचार करीत आहे, असे कदम यांनी सांगितले.
मनपा, न.प. आणि ग्रा. पं.ना पारितोषिके
शंभर टक्के प्लास्टिक बंदी करणाऱ्या राज्यातील महानगर पालिकेस 25 लाख, नगर परिषदेस 15 लाख तर सहा महसूल विभागातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीस 10 लाख रुपयांचे पारितोषिक पर्यावरण दिनी देण्यात येईल, अशी घोषणा यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली.
इतर बातम्यांचाही मागोवा…
- तंबाखू खाणार त्याला…
- हरबऱ्यांच्या हिरव्या पानाची गावरान भाजी