राज्यात कोविड संदर्भात 2 लाख 86 हजार गुन्हे, 41 हजार व्यक्तींना अटक

33 कोटी 6 लाख रुपयांची दंड आकारणी

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मुंबई , 21 ऑक्टोबर 2020:

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार  2 लाख 86 हजार गुन्हे, तसेच 1347 वाहनांवर अवैध वाहतुकीचे गुन्हे दाखल झाले तर 33 कोटी 06 लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात  22 मार्च ते 20 आँक्टोबर पर्यंत कलम 188 नुसार 2,86,330 गुन्हे नोंद झाले असून 41,618 व्यक्तींना अटक करण्यात आली. 96,596 वाहने जप्त केली. यातील विविध गुन्ह्यांसाठी  33 कोटी 06 लाख 89 हजार 358 रु. दंड आकारण्यात आला.

कोरोना योध्द्यांवरील हल्यांबाबत 902 व्यक्ती ताब्यात

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या 378 घटना घडल्या. त्यात 902 व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

100 नंबरवर 1 लाख 14 हजार फोन

पोलीस विभागाचा 100 नंबर  हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर  1,14,065फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1347 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर 96,596 वाहने जप्त करण्यात आली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील 244 पोलीस व 26 अधिकारी अशा एकूण 270 पोलिस कर्मचारी/अधिका-यांचा मृत्यू झाला.

—————————————————————————————————————————————–