स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत कोकण विभागात फाळणी वेदना स्मृती दिन प्रदर्शनाचे आयोजन

 प्रदर्शनास  नागरिकांनी भेट देण्याचे डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे आवाहन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • अलिबाग, 13 ऑगस्ट 2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत कोकण विभागातील रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये 14 ऑगस्ट  रोजी “फाळणी वेदना स्मृती दिन” प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. 14 ऑगस्ट च्या मध्यरात्री हा सोहळा झाला. मात्र देशाची फाळणी झाल्याने लाखो जण विस्थापित झाले, अनेकांना यात प्राण गमवावे लागले. त्यामुळे 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळण्यात येणार आहे. त्या काळी विस्थापित झालेल्या व हिंसाचारामुळे जीव गमवावा लागलेल्या साऱ्यांच्या वेदना वर्तमान व भावी पिढीला माहिती व्हाव्यात व त्याची सदैव आठवण राहावी, यासाठी हा फाळणी वेदना स्मृतीदिन घोषित करण्यात आलेला आहे. भेदभाव, वैमनस्य आणि द्वेष भावना संपविण्यासाठी प्रेरित व्हावे व एकता आणि सामाजिक सद्भावना यासोबतच मानवी संवेदना सशक्त व्हावी, या उद्देशाने हा दिवस पाळला जाणार आहे.

प्रदर्शनामध्ये या दिवसाची आठवण करून देणाऱ्या ऐतिहासिक दस्तऐवजांचे छायाचित्रासह माहितीचे हे प्रदर्शन नागरिकांसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत खुले राहणार आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यात पनवेल येथे आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह,‍ ओरियन मॉल, लिटल वर्ल्ड मॉल, खारघर, ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर, कॅम्प नं.3  टाऊन हॉल,  पालघर ‍जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय, व पालघर तहसिल कार्यालय, रत्नागिरी ‍जिल्ह्यात थिबा पॅलेस तर ‍सिंधुदूर्ग जिल्ह्यात ओरस येथील जिल्हाधिकारी  कार्यालयाचे जिल्हा नियोजन समितीचे सभागृह  या ठिकाणी फाळणी वेदना स्मृती दिन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोकण विभागातील सर्व जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देवून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त (प्र.) तथा रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.