नवी मुंबईकरांनो पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा

नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांचे आवाहन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, २१ ऑक्टोबर २०२२

नवी मुंबईकर नागरिकांनी हा दीपोत्सव हरित व पर्यावरणपूरक तसेच सुरक्षितरित्या साजरा करावा असे आवाहन करीत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी समस्त नवी मुंबईकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाचे ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’, ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ आणि ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण अभियान’ अंतर्गत नागरिकांनी फटाकेमुक्त, प्लास्टिकमुक्त, कचरामुक्त, प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक (ग्रीन फेस्टिवल) सण-उत्सव साजरे करावेत. नागरिकांनी फटाक्यांचा वापर टाळावा. प्लास्टिकचा वापर टाळून कापडी किंवा कागदी पिशवीचा वापर करावा तसेच सण-समारंभामध्ये टाकाऊ वस्तूंचा व पुनर्वापर करण्यायोग्य वस्तूंचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करावा आणि पर्यावरणपूरक, प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करावी,असे आवाहन नार्वेकर यांनी केले आहे.

भारत सरकार अधिसूचना क्रमांक जी.एस.आर. 682 (ई), दि. 05/10/1999 अन्वये 125 डीबी (एआय) पेक्षा जास्त आवाज निर्माण करणा-या फटाक्यांचे उत्पादन, विक्री किंवा वापर करणे बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार बेरियम सॉल्ट, लिथीयम, अर्सेनिक, लीड, मर्क्युरी यासारखे घटक असणारे फटाके वापरण्यासही बंदी आहे. या घटकांमुळे विषारी वायू तयार होतात. हे वायू प्राणी व वनस्पती या दोघांनाही घातक आहेत.

जनहित याचिका क्र. 152/2015 मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार फटाका विक्रेत्यांनी विस्फोटक व अधिनियम 1884 आणि त्या अंतर्गत केलेले विस्फोटक नियम 2008 मधील प्रतिबंध व नियम यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार फटाके विक्रेत्यांनी बंदी असलेले फटाके विक्री करावयाची नाही. तसेच परवानगी असलेले फटाके महानगरपालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी परवानगी घेऊनच विक्री करावयाची आहे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.