दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांना आळा घालणे आवश्यक – परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, २९ ऑक्टोबर २०२२

दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांपर्यंत पोहोचून त्यास आळा घालणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व देशातील सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस.जयशंकर यांनी केले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची बैठक मुंबईमध्ये ताज हॉटेल येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी (२६/११) मुंबईत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष तथा गॅबॉन प्रजासत्ताक देशांचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मायकल मौस्सा अडामो प्रामुख्याने उपस्थित होते.

भारत २०२२ साठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीचा अध्यक्ष आहे. या समितीमध्ये सदस्य देशांसह संयुक्त राष्ट्रसंघाच्या १५  देशांतील राजनैतिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची दोन दिवसीय बैठक भारतात होत आहे. मुंबईमध्ये ताज हॉटेल येथे बैठक झाली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीने ‘दहशतवादाच्या वित्तपुरवठ्याशी लढा’ या विषयावर अनौपचारिक चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते. यात स्थानिक आणि क्षेत्रीय पातळीवरील उपाययोजनांसंदर्भात चर्चा झाली.

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. जयशंकर म्हणाले, दहशतवाद विरोधात लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक आहे. दहशतवाद आणि त्यांच्या प्रायोजकांविरुद्ध ठोस कारवाई करावी लागेल. दहशतवाद्यांची सुरक्षित आश्रयस्थाने, प्रशिक्षण स्थळे शोधून त्यांना असलेले राजकीय समर्थन आर्थिक आणि वैचारिक संरक्षण नष्ट करणे आवश्यक आहे.

गेल्या काही वर्षांत, दहशतवादी गटांनी त्यांना मिळत असलेल्या मिळकतीच्या पद्धतीमध्ये  विविधता आणली आहे. त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढवला आहे. वित्तपुरवठ्यासाठी उपलब्ध असलेल्या अनामिकतेचा फायदा घेऊन व्हर्च्युअल चलने वापरून निधी उभारणी सुरु केली आहे. या संदर्भात, अधिक विचारमंथन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला विचारात घेऊन नाविन्यपूर्ण उपाय योजण्यासाठी उद्या नवी दिल्ली येथे होणाऱ्या समितीच्या विशेष बैठकीत चर्चा होईल, अशी अपेक्षा डॉ. जयशंकर यांनी व्यक्त केली.

=====================================================