- स्वप्ना हरळकर/अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 3 ऑगस्ट 2025
कबुतरखाने बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेने तत्काळ मोहीम राबवावी असे निर्देश राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात दिले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने कबुतरखान्यावर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे कबुतरांना खायला घालणारा एक गट आणि या खाना प्रकरणाचा विरोध करणारा दुसरा गट असे दोन गट तयार झाले आहेत. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा कबुतर हा पक्षी प्रकाशझोतात आला आहे.
रोजगाराच्या शोधात किंवा अधिक चांगल्या जीवनमानाच्या शोधात लोकसंख्येचा ओढा गावातून शहराकडे येऊ लागला. मग राहण्यासाठी टोलेजंग इमारती तयार झाल्या. या इमारती मध्ये कोपर्यात कबुतर आणि मधाची पोळी हमखास दिसू लागली. पूर्वी कबुतर केवळ झाडावर किंवा बाल्कनीत यायचे नंतर ते घरातही येऊ लागले. कबुतरांना घरात येण्यापासून प्रतिबंध व्हावा यासाठी मग घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवल्या गेल्या. पण यामुळे कबुतरांचा त्रास काही कमी झाला नाही. त्यांच्या विणीच्या काळात ही कबुतरं जाळ्या तोडून पुन्हा घरात येण्याचा प्रयत्न करतातच. हा त्रास जवळपास प्रत्येक छोट्या मोठ्या इमारतीमध्ये राहणा-या रहिवाशांना सहन करावा लागतो. कबुतरांपासून वाचण्यासाठी आपण कायम जाळी लावलेल्या ठिकाणी राहू शकत नाही हे देखील वास्तव आहे.
दरवेळी आपण विचार करतो की एवढी कबुतरांची संख्या वाढते तरी कशी. पण उत्तर मिळत नाही. कबुतराच्या आसपास असण्याचा अंदाज आपण सहज लावू शकतो तो त्यांच्या गुटरगु या सततच्या आवाजाने. या आवाजाने त्रास तर होतोच. पण जास्त त्रास होतो तो त्यांच्या पिसांमुळे आणि त्यांच्या विष्ठेमुळे. कबुतरांना खायला दाणे टाकू नका असं जवळपास प्रत्त्येक महापालिका सांगत आहे. मात्र तरीही काही नागरिकांकडून त्यांना खायला टाकलं जातं. कबुतरांना ज्या ठिकाणी खायला मिळतं तिथं ती वावरतातत पण त्याच्या आजूबाजूच्या भागातही त्यांचा वावर असतो. बर्याचदा आपल्या भागातले किरकोळ वाणसामान विकणारे विक्रेते आपल्या दुकानातील धान्य पाखडून झाल्यानंतर ते दुकानांच्या समोरच्या मोकळ्या जागेत धान्याचे दाणे टाकतात. हे दाणे खाण्यासाठी सर्व पक्षी जमा होतात पण त्यात कबुतरांची संख्या जास्त असते. स्वच्छ सर्वेक्षण करण्यात मग्न असणाऱ्या पालिकांनी याबाबत मात्र कानाडोळा केल्याचं नेहमीच दिसून येतं.
कबुतरांना खायला टाकू नये असं लिहिलेल्या सूचना फलकाच्या खालीच काही पक्षीप्रेमी दाणे टाकून मोकळे होतात. त्यामध्ये दरवेळी दाणे असतातच असं नाही त्यामध्ये फरसाण, उरलेला भात, चिवडा असं काहीही असतं. बर्याचदा रहदारीच्या रस्त्याच्या कडेला हे पदार्थ टाकले जातात. जे खाण्यासाठी पक्षांचे थवे रस्त्यावर येतात. दुद्रैवाने त्यामधले काही पक्ष्यांना अपघात होऊन ते जखमी होतात.
पक्षांना खाण्यासाठी टाकणे हा गुन्हा आहे हे माहित असतानाही अनेकांकडून हा केला जातो. याला कारण काहिप्रमाणात अंधश्रद्धा देखील आहे. काही प्रमाणात सामाजिक माध्यमांवर प्रसारित केले जाणारे संदेश आणि अमुक दिवशी दाणे टाका मग ग्रहांच्या चालीपासून मुक्तता मिळेल यासारखे फसवे संदेश आणि या संदेशांना भुलून दाणे टाकणारे लोक. या सर्वांवरही कारवाई होण्याची गरज आहे. फार पूर्वीपासून चालत आलेल्या प्रथा परंपरा पाळण्याच्या नादात या पक्षांचा मात्र आपणच जीव घेतोय हे आपल्याला समजत नाही. ग्रामीण जीवन जगताना माणूस आणि पक्षी यांचा एकमेकांना त्रास होत नव्हता. आता मात्र हा संघर्षाचा मुद्दा तयार झाला आहे.
निसर्गात आपल्या आजूबाजूला असंख्य प्रकारचे प्राणी, पक्षी अस्तित्वात आहेत. काही दुर्मिळ आहेत तर काहिंची संख्या वाढत आहे. शहर काय किंवा गाव काय जंगलतोड झाली आणि या पक्षाचं घर आपण हिरावून घेतलं. मग त्यांनी आपल्या घरांच्या आजूबाजूच्या भागात रहायला सुरूवात केली. कावळा, चिमणी, कबुतर, पोपट यांसारखे पक्षी शहरातल्या सिमेंटच्या इमारतींमध्ये जगायला शिकले. पण कबुतराच्या पिसांचा आणि विष्ठेचा त्रास मानवी आरोग्यावर विशेष होत आहे. त्यामुळेच मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये कबुतरखाने बंद करण्यासाठी पालिकेला कसरत करावी लागत आहे.
पक्षांना खायला टाकू नका असं आवाहन करावं लागत आहे. इथे मुद्दा हा देखील आहे की दाणे टाकले नाहीत म्हणून कबुतरं मरणार आहेत का तर तसं काही होणार नाही. पक्षी आहेत ते अनेक ठिकाणी स्थलांतरित होणार आणि कदाचित ही समस्या महानगरांमध्ये जास्त प्रमाणात वाढेल. त्यामुळे केवळ गुन्हे दाखल करून किंवा आवाहन करून काही होणार नाही. यावर उपाय शोधावा लागणार आहे.
========================================================

















