प्रत्येक गावात भाजपाची शिवार संवाद सभा

मुंबई, 12 मे 2017/AV News Bureau:

राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन माहिती देण्यासाठी  भाजपतर्फे २५ ते २८ मे अशा चार दिवस राज्यातील प्रत्येक गावात शिवार संवाद सभा घेण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्यासह भाजपाचे सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व नगरसेवक असे चार हजार लोकप्रतिनिधी या संवाद मोहिमेत सहभागी होणार आहेत.

राज्याचे कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. डॉ. संजय कुटे या अभूतपूर्व शेतकरी संवाद सभांचे नियोजन करीत आहेत. या संवाद उपक्रमात पहिल्या दिवशी गुरुवार, २५ मे रोजी एकाच दिवशी सोळा हजार गावांमध्ये सोळा हजार सभा होणार आहेत. प्रत्येक लोकप्रतिनिधी सकाळी दोन व सायंकाळी दोन सभांमध्ये संवाद करेल. हा उपक्रम रविवार, २८ मे रोजी पूर्ण होणार आहे.

पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्यात लातूर जिल्ह्यातील गावांमध्ये तर प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे उत्तर महाराष्ट्रात नंदूरबार जिल्ह्यात आदिवासी गावांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद करतील. त्याच दिवशी पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, कोकणात शिक्षणमंत्री विनोद तावडे तसेच बीड जिल्ह्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.