पेट्रोल दरवाढीविरोधात काँग्रेसचा राज्यभर आंदोलनाचा इशारा

इंधनावरील अधिभार आणि मुद्रांक शुल्कातील वाढ मागे घेण्याची मागणी

मुंबई, १९ मे 2017/AV News Bureau:

राज्य सरकार आर्थिक आघाड़ीवर पूर्णपणे अपयशी ठरले असून खर्च आणि उत्पन्नाच्या बाबतीत कुठलेही नियोजन राहिलेले नाही. एकीकडे जाहिरातीवर कोट्यवधी रूपयाची उधळपट्टी सुरु आहे तर दुसरीकडे पेट्रोल डिझेलवर अधिभार लावून तसेच मुद्रांक शुल्कात वाढ करून सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा घालण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. सरकारने इंधनावरील अधिभार आणि मुद्रांक शुल्कात केलेली वाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस पक्ष राज्यभर तीव्र आंदोलन करेल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

सरकारने यापूर्वी दुष्काळ जाहीर न करता पेट्रोलवर ६ रुपये दुष्काळी सेस लावला आहे, दुष्काळ संपला तरी त्याची वसुली सुरुच आहे. त्यातच गेल्या एप्रिल महिन्यात पेट्रोलवर 3 रूपये प्रति लीटर अधिभार लावण्यात आला होता आणि आता त्यात आणखी 2 रूपयांची भर घालून सरकारने सरसकट एकूण ११ रुपये अधिभार आता पेट्रोलवर लावला आहे. संपूर्ण देशात सगळ्यात महाग पेट्रोल महाराष्ट्रातल्या जनतेला खरेदी करावे लागते आहे. शहरी आणि ग्रामीण भागासाठी मालमत्ता हस्तांतरणाकरिता मुद्रांक शुल्क वाढवून आधीच महागाईने पिचलेल्या जनतेला आणखी मोठ्या संकटात टाकले आहे. सरकारने ही अन्यायकारक शुल्क वाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस राज्यभर रस्त्यावर उतरून सरकारविरोधात तीव्र आंदोलन उभारेल असे खा. चव्हाण म्हणाले.

छोट्या शहरांना विमान सेवेने जोडण्यासाठी केंद्र सरकारने उडाण योजना जाहीर केली, या सेवाचा फायदा राज्यातील फक्त दोन शहरांना होणार आहे मात्र गुजरातमधील सहा शहरांना या योजनेचा फायदा होणार आहे. ही योजना फक्त गुजरातसाठीच आहे का ? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सरकारला केला. राज्यात एकूण 20 विमानतळ तयार आहेत. अपेक्षा होती की इतक्या मोठ्या प्रमाणात विमानतळ उपलब्ध असताना राज्यातील आणखी काही शहरांचा या योजनेत समावेश केला जाईल अशी अपेक्षा होती परंतु गेल्या अडीच वर्षाच्या भाजप सरकारच्या काळात अनेक प्रकल्प गुजरातला नेले गेले आहेत त्याच धर्तीवर या योजनेचा लाभ मोदी कृपेने गुजरातला मिळत आहे आहे असे खा. चव्हाण म्हणाले.

भाजपा सरकारने ४०० कोटींचा तूर घोटाळा केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना केलेल्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तूरीचे पीक घेतले पण आता सरकार शेतकऱ्यांची तूर विकत घेत नाही. राज्यात व्यापा-यांनी सुमारे ४०० कोटींची तूर खरेदी केंद्रावर शेतक-यांच्या नावाने विकली आहे. सरकारच्या आशिर्वादाने तूर खरेदीत मोठा घोटाळा झाला असून मुख्यमंत्र्यांचे व्यापाऱ्यांशी लागेबांधे आहेत. म्हणून मुख्यमंत्री या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत नाहीत असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम केला.

या पत्रकारपरिषदेला मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम,  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत, सरचिटणीस विनायकराव देशमुख, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस संदेश कोंडविलकर व अल् नासेर झकेरिया उपस्थिते होते.