नवी मुंबईत फेरीवाल्यांचे हल्लाबोल आंदोलन

नवी मुंबई, 2 फेब्रुवारी 2017/ avirat vaatchal news:

फेरीवाल्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नवी मुंबई फेरीवाला संघटना कृती समितीच्या वतीने आज महापालिका मुख्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पथविक्रेता बायोमेट्रिक सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पथविक्रेता समिती गठित करण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन महापालिका  प्रशासनाने दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

फेरीवाला सर्वेक्षण सुरू असताना  फेरीवाल्यांवर अतिक्रमण कारवाई करू नये. फेरीवाल्यांचा  माल जप्त करताना मालाचा पंचनामा करून संबंधित फेरीवाल्यांना त्या मालाची पावती देण्यात यावी. फेरीवाला सर्वेक्षण पुन्हा करण्यात यावे . पंधरा वर्षांची अट रद्द करून 2014 पासून ची सर्वेक्षण झालेली कागदपत्रे घेण्यात यावीत. स्वच्छ सर्वेक्षण मोहीम अंतर्गत फेरीवाल्यांचा व्यवसाय बंद करण्यासाठी मनपा अधिकारी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. अशा अधिका-यांच्या बदल्या करण्यात याव्यात. कायदा न पाळणार्‍या मनपा अधिका-यांच्या विरोधात कंडम ऑफ कोर्ट करून न्यायालयात जाणार असल्याचे युनियन चे कार्याध्यक्ष बाळकृष्ण खोपडे यांनी यावेळी सांगितले.

ठाणे जिल्हातील सर्वच महानगर पालिका आयुक्त फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ठोस भूमिका घेत नसल्याचा आरोप महाराष्ट्र हॉकसॅ फेडरेशन च्या सचिव विनिता बाळेकृदी यांनी केला.

येत्या  पंधरा दिवसांत  फेरीवाल्यांचे प्रश्न न सुटल्यास 14 फेब्रुवारी रोजी  कोकण विभागीय आयुक्त कार्यालयावर आक्रोश आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात ठाणे जिल्हातील फेरीवालेदेखील सहभागी होतील असा इशारा कृती समितीचे अध्यक्ष अॅड सुरेश ठाकूर यांनी दिला.

या आंदोलनात युनियन चे उपाध्यक्ष शञुघन पाटील, सचिव नरेंद्र वैराल, फेरीवाला प्रतिनिधी अशोक जमादार, शंकर पडूलकर, नवनाथ डोंगरे,  अभूभाई शेख, शञुघन पाटील, गिताताई भोसले, ज्ञानेश्वर वायकर, बबलू कुशवा, प्रभावती शिंदे, लक्ष्मी कांबळे, संजय हलवाई, संजय भालके, पांडूरंग धोञे, विजय धनावडे तसेच फेरीवाले उपस्थित होते.