राज्यात कृषी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती करणार

कृषी मालाचा महाराष्ट्र ब्रँड विकसित करण्यासाठी विशेष टास्क फोर्स

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 3 जून 2021:

राज्यामध्ये कृषी प्रक्रिया व मालाची विक्री, मुल्यसाखळीचे बळकटीकरणाच्या अनुषंगाने विविध योजनांची सांगड घालण्यासाठी कृषी प्रक्रिया संचलनालयाची निर्मीती करणार असल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. कृषी हवामानानुसार विविध पिकांचे क्लस्टर विकसित करणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी सांगितले

कृषी प्रक्रिया, कृषी मुल्यसाखळी बळकटीकरण व कृषी मालाची विक्री व्यवस्था बळकटीकरणाच्या अनुषंगाने विविध योजनांची सांगड घालण्यासाठी मंत्रालयात कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी, राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार, कृषी संचालक सुभाष नागरे, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कृषी मालाचा महाराष्ट्र ब्रँड विकसित करणार

कृषी मालाचा महाराष्ट्र ब्रँड विकसित करण्यासाठी उत्पादन निहाय मानके निश्चित करावी. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या तालुक्यात शहरीकरण मोठ्या प्रमाणावर झाले असल्याचे लक्षात घेवून या भागात कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा ही विक्री व्यवस्था बळकट करण्यासाठी वापरावी व याकरीता विशेष टास्क फोर्सची निर्मिती करावी. महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळ व कृषी विद्यापीठे यांनी देखील या बाबींकडे विशेष लक्ष देवून कृषी प्रक्रिया, कृषी मुल्यसाखळी बळकटीकरणासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न करावेत, असे भुसे यांनी सांगितले.

नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प, मा.बाळासाहेब ठाकरे ग्रामीण व कृषी परिवर्तन प्रकल्प, प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजना, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना, गट शेती योजना यासारख्या वेगवेगळया योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा समन्वयासाठी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती करण्यात येणार आहे, असे भुसे यांनी सांगितले.

——————————————————————————————————