एक्स-रे बॅगेज स्कॅनिंग मशीनव्दारे नमुंमपा मुख्यालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम

  • अविरत  वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, ६ ऑक्टोबर २०२२

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आणलेल्या सुरक्षा उपकरणामधील एक्स्‍ – रे बॅगेज स्कॅनिग मशीन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याहस्ते आजपासून सुरु करण्यात आली. या मशीनमुळे महापालिकेच्या सुरक्षेत आणखी भर पडणार असून आणखी अत्याधुनिक लवकरच महापालिका मुख्यालयाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेची मुख्यालय इमारत ही आकर्षक वास्तुरचनेमुळे आयकॉनिक इमारत म्हणून देशभरात नावाजली जाते. महापालिकेच्या या इमारतीत विविध कामांकरिता नागरिकांची तसेच अभ्यागतांची नेहमीच वर्दळ असते. सध्या रस्त्यावरील मुख्य प्रवेशव्दारावर नागरिकांची रजिस्टरला नोंदणी करुन मुख्यालयात प्रवेश देण्यात येतो. या ठिकाणी मानवीय पध्दतीने व्यक्तींची व त्यांच्याकडील बॅग व इतर सामानांची तपासणी करण्यात येते. मात्र आता अत्याधुनिक उपकरणांचा वापर करून सुरक्षा व्यवस्थेवरील ताण कमी होण्यास हातभार लागणार आहे.

एक्स्‍ – रे बॅगेज स्कॅनिग मशीनव्दारे महापालिका मुख्यालयात येणा-या व्यक्तीकडील साहित्य या स्कॅनिग मशीन मधील स्वयंचलित पट्ट्यावर ठेवले जाणार असून मशीनव्दारे त्या साहित्याचे स्कॅनींग होऊन असुरक्षित वस्तू असल्याचे त्वरीत निदर्शनास येणार आहे. मुख्यालयातील तळमजल्यावरील प्रवेशव्दार व तळघरातील प्रवेशव्दार (बेसमेंट) या दोन ठिकाणी या स्कॅनिग मशीन ठेवण्यात येणार असून त्या हाताळण्याचे रितसर प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे.

याशिवाय महापौर कार्यालय व आयुक्त कार्यालय या ठिकाणी पोल डिटेक्टर सुरक्षा साधने सुरू करण्यात आली आहेत. या अत्याधुनिक उपकरणांच्या माध्यमातून असुरक्षित वस्तूंवर काटेकोर नजर ठेवली जाणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीची सुरक्षा व्यवस्था सक्षम होण्याकरिता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ या शासकिय संस्थेने सुरक्षा परीक्षणामध्येही ही उपकरणे बसविणेबाबात सूचित करण्यात आले होते. त्यानुसार लवकरच व्हिझिटर मॅनेजमेंट सिस्टीम, व्हेईकल स्कॅनिंग सिस्टीमही कार्यान्वित करण्यात येणार आहे. याव्दारे महानगरपालिका मुख्यालयात येणा-या नागरिक व अभ्यागत यांची सर्व माहिती घेऊन व त्यांना ई – पास देऊनच मुख्यालयात प्रवेश दिला जाईल. त्याचप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टीने मुख्यालयात येणा-या वाहनांची यांत्रिकी तपासणी करुनच आवश्यकतेनुसार प्रवेश दिला जाणार आहे.

आपतकालीन विभागाच्या माजी उपायुक्त संध्या अबादे यांनी विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सुरक्षेच्यादृष्टीने शिस्त लावण्याचा प्रामुख्याने प्रयत्न केला होता.  त्यांच्या काळात त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक यंत्रणा राबविण्याबाबत त्यावेळचे महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ आणि अभिजीत बांगर यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त नितिन नार्वेकर, शहर अभियंता संजय देसाई, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या उपआयुक्त मंगला माळवे, परिमंडळ 1 उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त बाबासाहेब राजळे, भांडार विभागाचे उपआयुक्त अनंत जाधव आदी उपस्थित होते.