मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; वाहतूक बंद; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं पोलिसांचं आवाहन

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

रत्नागिरी, 8 जून 2025

मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळी रत्नागिरी तालुक्यातल्या निवळी घाटात बावनदीच्या जवळ मिनी बस आणि एलपीजी वाहतूक करणारा टँकर यांची धडक होऊन अपघात झाला. यामुळे मिनी बस रस्त्याच्या कडेला दरीत कोसळली आणि बसमधले २०-२२ प्रवासी जखमी झाल्याचं वृत्त आहे. जखमींना रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दरम्यान, अपघातग्रस्त टँकरमधून एलपीजीची गळती होत असून, मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी बावनदी भागात येऊ नये. त्यांनी पाली आणि संगमेश्वर इथून पर्याय मार्गांचा वापर करावा, असं आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी अपघातस्थळावरून केलं आहे. वायुगळती होत असल्याने वाहतूक सध्या त्या भागातली वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. महामार्गाजवळचं घर, बाग आणि वाहनं यांचंही या अपघातात नुकसान झाल्याचं समजतं.

घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलासह आपत्कालीन सेवा यंत्रणा दाखल झाल्या असून, मदतकार्य सुरू आहे.