माझी वसुंधरा अभियानात नवी मुंबई महानगरपालिकेला राज्यात दुसरा क्रमांक

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 5 जून 20201:

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने आयोजित माझी वसुंधरा अभियानामध्ये राज्यातील अमृत शहरांच्या गटात नवी मुंबई महानगरपालिकेला राज्यात दुसरा क्रमांक मिळाला आहे. आज ऑनलाईन पारितोषिक वितरण समारंभात नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी हा सन्मान स्विकारला.

आज ऑनलाईन पारितोषिक वितरण समारंभात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री.बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर ऑनलाईन पध्दतीने उपस्थितीत होते.

भूमी, जल, वायू, अग्नि, आकाश या पंचतत्वांच्या अनुषंगाने प्रत्येक शहराने केलेल्या उल्लेखनीय कामांची नोंद घेत वसुंधरा अभियान राबविण्यात आले असून यामध्ये 43 अमृत शहरे, 222 नगरपरिषदा, 130 नगरपंचायती तसेच 291 ग्रामपंचायती अशा एकूण 686 संस्था सहभागी झाल्या होत्या. 1 जानेवारी 2020 ते 15 एप्रिल 2021 या कालावधीमध्ये वृक्षलागवड, जलसंवर्धन, वायू प्रदूषण नियंत्रण, घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जा बचत व पर्यावरणविषयक  जनजागृती या विविध बाबींमध्ये केलेल्या कामांचे ध्वनीचित्रफित सादरीकरण तसेच वेब लिंकव्दारे प्रत्यक्ष स्थळ पाहणी या माध्यमातून अभियान परीक्षण करण्यात आले. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका राज्यातील व्दितीय क्रमांकाची मानकरी ठरली.

नवी मुंबई महानगरपालिकेची माझी वसुंधरा अभियानांतर्गत कामगिरी

यंदाच्या वर्षात 1 लाख वृक्षलागवडीचे नियोजन

माझी वसुंधरा अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने पंचतत्वांच्या अनुषंगाने केलेल्या नाविन्यपूर्ण बाबींचा विशेष विचार करण्यात आला. यामध्ये निसर्गउद्यान, कोपरखैरणे येथे पश्चिम घाटातील दुर्मिळ प्रजातींसह 59 देशी प्रजातींची मियावाकी पध्दतीने 43 हजार वृक्षलागवड करण्यात आली, हे काम सीएसआर निधीमधून करण्यात आले आहे. यामुळे या परिसरात जैवविविधता वाढीस लागली आहे. त्याचप्रमाणे मोरबे धरण प्रकल्प परिसरातही 17 देशी प्रजातींची 40 हजार वृक्षलागवड करण्यात आली आहे. तसेच शहरात विविध ठिकाणी हरितपट्टे निर्माण करण्यात आले आले आहेत. सायन पनवेल महामार्गालगत 2800 देशी प्रजातींची वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. या आर्थिक वर्षात 1 लाख वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले असून वृक्षारोपणाप्रमाणेच वृक्षसंवर्धानाकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. सध्या 4 व्यक्तींमागे 3 झाडे हे नवी मुंबईतील प्रमाण असून ते या वर्षात प्रतिव्यक्ती 1 झाड करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

कचरा प्रक्रिया प्रकल्प

देशातील स्वच्छ शहरांमध्ये तृतीय क्रमांकाचे मानांकीत शहर असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेची कचरा संकलन, वाहतूक व विल्हेवाट हे संपूर्ण घनकचरा व्यवस्थापन व प्रकल्प देशातील पर्यावरणपूरक उत्तम म्हणून नावाजला जात असून तेथे निर्माण होणा-या खताचे भू-निदान नामक ब्रँडींग करण्यात आले असून या खताचा वापर महानगरपालिकेची उद्याने फुलविण्यासाठी केला जात आहे. विशेष म्हणजे मियावाकी पध्दतीने उभारलेले कोपरखैरणे निसर्गोद्यानातील अर्बन फॉरेस्ट विकासातही याच खताचा वापर करण्यात आलेला आहे. एवढेच नाही तर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 20 सोसायट्या, 5 हॉटेल्स, 2 मंगल कार्यालये येथे स्वत:चे कचरा प्रक्रिया प्रकल्प आहेत. 5 झोपडपट्ट्यांमध्ये झिरो गार्बेज स्लम मॉडेल यशस्वीरित्या राबविले जात आहे. कम्पोस्ट बास्केटव्दारे 31 हजार घरांमध्ये कच-याची विल्हेवाट लावली जात आहे.

जल संवर्धन

स्वत:च्या मालकीचे मोरबे धरण असणारी नवी मुंबई ही स्वातंत्र्योत्तर कालखंडातील पहिली महानगरपालिका असून समाधानकारक जलपुरवठा करताना स्काडासारख्या अत्याधुनिक तंत्रप्रणालीव्दारे जलवितरणावर नियंत्रण ठेवले जात आहे. त्यामुळे लिकेजला प्रतिबंध येऊन जलबचत होत आहे.

रबाळे येथील मुंबादेवी डोंगर, पारसिक हिल अशा ठिकाणी पावसाचे पाणी साठवून त्यामधून त्या परिसरात वृक्षराजी फुलविण्यात आलेली आहे.

त्याचप्रमाणे स्वच्छ तलावांचे शहर अशी वेगळी ओळख असणा-या नवी मुंबईतील सर्व तलावांची नियमित स्वच्छता राखण्याप्रमाणेच त्याठिकाणी सुशोभिकरण व आकर्षक कारंजे, विद्युत रोषणाई करून नागरिकांसाठी मनोरंजक ठिकाणे करण्यात आली आहेत. तलावातही जैवविविधता वाढावी यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.

अपारंपारिक ऊर्जा

अपारंपारिक ऊर्जेला महत्व देण्याच्या दृष्टीने महापालिका मुख्यालयासह माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय नेरूळ तसेच घणसोली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर रबाळे येथील शाळांमध्ये सौरउर्जा पॅनल बसविण्यात आलेले आहेत. याचा उपयोग विद्युत बचतीसाठी होत आहे.  पर्यावरणपूरक प्रवासी सेवा पुरविताना एनएमएमटीच्या एकूण 500 बसेसपैकी 60 टक्के बसेस या सीएनजी तसेच इलेक्ट्रिकल असून 9 चार्जींग स्टेशन्स उभारण्यात आलेली आहेत तसेच 31 प्रगतीपथावर आहेत. प्रदूषणमुक्त वाहन म्हणून सायकलचा वापर वाढविण्याकडे विशेष लक्ष देत युलू सायकल आणि युलू ई बाईकला प्राधान्य देण्यात आलेले आहे.

निसर्गातील पंचतत्वांना अनुसरून नवी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या विविध नाविन्यपूर्ण कामांचा आणि पर्यावरणशील उपक्रमांचा विचार पुरस्कार निवड समितीने केला.

  •  वसुंधरा अभियानातील हा गौरव नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळेच प्राप्त झाला असून यासाठी सर्व नागरिकांचे अभिनंदन . यापुढील काळात पर्यावरण संवर्धानाच्या दृष्टीने सर्व मिळून अधिक चांगली कामगिरी करूया .

अभिजीत बांगर

महापालिका आयुक्त

——————————————————————————————————-