अन्यथा भाजपचीही मनसेसारखी अवस्था होईल

उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावरून आझमी यांचा टोला

मुंबई, 4 डिसेंबर 2016/ AV News Bureau :

भाजपा एकिकडे उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकांसाठी उत्तर भारतीय मतदारांना विविध आश्वासने देऊन आपल्याकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे त्याच भाजपचे महाराष्ट्रातील आमदार मात्र उत्तर भारतीयांना दमदाटी करून मारहाण करत आहेत. भाजपाने ही दुटप्पी भुमिका सोडावी, अन्यथा लवकरच त्यांची अवस्थासुद्धा राज ठाकरेंच्या मनसे प्रमाणेच होईल, अशा शब्दांत समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजपचे कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाने डोंबिवली येथे जागेच्या वादातून एका उत्तर भारतीय नागरिकाला केलेल्या मारहाणीच्या घटनेबाबत ते बोलत होते.

उत्तर प्रदेशात हेच भाजपावाले उत्तर भारतीयांच्या मतांसाठी त्यांच्यावर आश्वासनांची खैरात करत आहेत, तर महाराष्ट्रातील उत्तर भारतीय नागरिकांवर मात्र हेच भाजपवाले अन्याय करत आहेत. भाजपाने हा दुटप्पीपणा सोडून हे मतांचे राजकारण बंद करावे, अन्यथा येत्या महापालिका निवडणुकीत भाजपाची अवस्था सुद्धा राज ठाकरेंच्या मनसेसारखी होण्यास वेळ लागणार नाही असा टोलाही आझमी यांनी लगावला.