नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा श्रीधर मढवी यांचा आरोप
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 15 जून 2025
जुईनगर सेक्टर २३ येथे शाहीर कृष्णा पाटील उद्यान हे एकमेव गार्डन आहे. मात्र नियमित देखभाल तसेच उद्यानातील विकास कामांकडे सातत्याने दुुर्लक्ष होत आहे. याबाबत वेळोवेळी महापालिका प्रशासनाकडे लेखी मिनतवाऱ्या केल्या तरी अधिकारी वर्ग लक्ष देत नसल्यामुळे या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. परिसरातील नागरिकांना एक सुस्थितीतील उद्यान मिळावे यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्वतः याप्रकरणी लक्ष घालून दिलासा मिळवून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीधर मढवी यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
स्थानिक नगरसेविका तनुजा मढवी २०१५ मध्ये निवडून आल्यानंतर त्यांनी इतर नागरी कामांबरोबर या उद्यानाचेही काम करण्याबाबत प्रशासनाला विनंती अर्ज दिला होता. या ठिकाणी दोन गजेबो, पाथवे, लाल माती टाकणे, खेळणी बसवणे, हिरवळ लावणे या सारखी कामे होती. मात्र अधिकारी या कामाकडे लक्ष देत नव्हते. शेवटी खर्चात कपात करून या उद्यानाचे काम पूर्ण करण्यात आले. सुरुवातीला या ठिकाणी एक माळी तोही वयस्कर असल्यामुळे त्याला पाणी चालू असे पर्यंत पूर्ण झाडांस पाणी देणे शक्य होत नव्हते, परिणामी जे उद्यान सुंदर दिसत होते ते दिवसेंदिवस खराब दिसू लागल्याचा आरोप मढवी यांनी केला आहे.
सध्या जैन नावाचा नवीन ठेकेदार उद्यानाच्या देखभालीचे काम करतो. ठेकेदार आला तरी त्याला ती सुंदरता पुन्हा आणता आली नाही. आजच्या घडीला माळ्यांची संख्या वाढविली आहे परंतु त्याना गार्डन सुंदर ठेवण्याचे धडे कोणी देत नसावे. ठीक ठिकाणी झुडुपे लावलेली होती ती मरून गेली त्यामुळे ती एकसंगती दिसत नाही. हिरवळीची दुरवस्था झाली आहे. ठीक ठिकाणी उकिरडे आहेत. झुडुपांची वेळोवेळी छाटणी होत नाही. स्वच्छतेचा अभाव देखील आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर असल्याचेही मढवी यांनी सांगितले.
सध्या नागरिकांना चालण्यासाठी जो पाथवे (उद्यानातील पदपथ) आहे त्याच्या दुरुस्तीच्या कामाचे टेंडर येऊन चार महिने झाले तरी अधिकारी ते काम करू देत नाहीत त्यामुळे नागरिकांना त्या तुटक्या फुटक्या पाथवे वरून चालणे मुश्किल होत आहे. विविध समस्यांबाबत महापालिकेच्या अभियंता तसेच उद्यान विभागाकडे लेखी निवेदने दिली. मात्र त्यावर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप श्रीधर मढवी यांनी केला आहे.
या ठिकाणी नियमा प्रमाणे सकाळी ५.३० वाजता उद्याव उघडायची वेळ असताना सकाळी आठ वाजता उद्यान उघडले जाते. माळी सकाळी येऊन लवकरच निघून जात असतो. योग्य देखभालीअभावी उद्यानाची अवस्था वाईट झाली असून नागरिकांना चांगले उद्यान मिळावे यासाठी महापालिका आयुक्तांनीच लक्ष घालावे अशी मागणी श्रीधर मढवी यांनी केली आहे.
=======================================================