बुद्धिमत्तेवर विश्वास हवा

  • प्ना हरळकर/अविरत वाटचाल
  • नवी मुंबई, 5 डिसेंबर 2025

कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली म्हणजे ज्याला इंग्रजीत एआय असं म्हटलं जातं. आजच्या डिजीटल युगात ही प्रणाली वेगाने वेगाने विकसीत होत आहे. जवळपास प्रत्येक क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मानवाच्या बुद्धीचा वापर करून मानवानेच बनवलेल्या तंत्रज्ञानाचा वापर मानवासाठीच केला जात आहे.
इलेक्ट्रॉनिक्सचे क्षेत्र विस्तारलं जाऊ लागलं तसं या क्षेत्रात नवीन नवीन शोध लागले. कॉम्प्युटर च्या शोधानंतर तर मानवाचे काम आणि जीवन दोन्ही बदलत गेले. अनेक शोध लागत गेले आणि जनरेशन तयार झाल्या आताच्या टेंन्सर प्रोसेसिंग युनिट मध्ये एआय, चॅट जिपीटी आलं. या युनिटमध्ये डेटा प्रोसेसिंग वेगाने सुरू झाला ज्याच्यामुळे एआय तंत्रज्ञान वेगाने विकसीत होत गेलं.

रोजच्या व्यवहारात जसं हे तंत्रज्ञान फायद्याचं ठरत आहे तसंच त्याचे धोकेही आहेत. नाण्याच्या दोन बाजू नेहमी असतात तशा त्या या तंत्रज्ञानालाही आहेत. वेगवेगळ्या इमेजेस, व्हिडिओ तयार करून त्या व्हायरल केल्याच्या घटना अलीकडच्या काळात खूप वाढू लागल्या आहेत. ज्याचा फटका केवळ प्रसिद्ध व्यक्तिंनाच नव्हे तर सामान्य माणसालाही बसू लागला आहे. सामाजिक माध्यमांवर एखादा धक्कादायक व्हिडिओ बघताना हा एआयने तयार केलेल् व्हिडिओ, आवाज तर नाही ना अशी शंका आता लोकांच्या मनात सर्वात आधी येऊ लागली आहे. त्यामुळे आता या तंत्रज्ञानावर आधारित गुन्हे रोखणं हे येत्या काळातील आव्हान असणार आहे. त्यासाठी तसे कडक कायदे करावे लागणार आहेत. त्यापेक्षाही जास्त या कायद्यांची जनजागृती करावी लागणार आहे. त्यात डिजीटल प्रोटेक्शन अ‍ॅक्ट म्हणजे डीपी हा त्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे. मात्र त्यातही मर्यादा असल्याचं या विषयातल्या तज्ञांचं मत आहे.

मानवी मेंदू जे विचार करतो जसा विचार करतो त्या विचारांचं प्रतिबिंब हे तंत्रज्ञान हाताळताना दिसून येत आहे. एखाद्या शेतकर्‍याला किंवा विद्यार्थ्याला या तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा आहे त्यावर त्याचं रूप आधारित आहे. एखाद्या व्हिडिओ मध्ये दिसणार्‍या हालचाली या वारंवार दिसू लागतात, मध्येच अंधूक होणारा व्हिडिओ, ओठांच्या हालचाली अशा काही खुणा दिसत असतील तर तो एआय तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेला व्हिडिओ असावा अशी शंका यायला हवी अर्थात त्यासाठी जनजागृती करावी लागणारच आहे अन्यथा सामान्य नागरिकाला व्हिडिओतला फरक फारसा समजून येणार नाही आणि तो एखाद्या गुन्ह्याला बळी पडू शकतो.
आताचं जग हे सामाजिक माध्यमांचं जग आहे. त्यामुळे काहीही नवीन केलं की उचल फोटो आणि डिटेल्स टाक या सवयीमुळे आपणच आपले डिजीटल फूटप्रिमटस तयार करत आहोत. आपणच मेसेजेस उघडून त्यावर माहिती देतो, अनोळखी लिंक शेअर करतो, शासनाकडून ओटीपी शेअर करू नका आणि शेअर करण्यासाठी आवश्यकता असल्यास काळजी घ्या असं आवाहन वारंवार केलं जात आहे. किती आणि कोणती माहिती या माध्यमांवर प्रसारित करायची हे सुद्धा आता प्रत्येकाने ठरवायला हवं. त्यातही आपल्या फोटोंचा, आपल्या माहितीचा चुकीचा वापर केल्याचा प्रकार उघडकीस आला तर माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार आपण तक्रार दाखल करू शकतो. मात्र त्यासाठी आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात यायला हवं.


एआय हे असं तंत्रज्ञान आहे जे तुम्हाला तुमच्या उद्देश पूर्ण करण्यासाठी मदत करते मात्र त्यावर पूर्णपणे विसंबून राहता येणार नाही. शेवटी मानवाचा मेंदू जितका तर्कशुद्ध आणि सुसंगत विचार करू शकतो तितका विचार तंत्रज्ञान करू शकणार नाही हा मुद्दा लक्षात ठेऊन आपल्या बुद्धीचा वापर करायला हवा. आपला मेंदू आपणच प्रोगाम करून त्यातून आपल्याला हवे असलेले डिझाइन बनवून तो सांभाळावा लागणार आहे. एआय त्यासाठी मदतीला घेऊन त्याच्या मदतीने प्रकल्प हाताळता येणारच आहे. पण जसा वेळ बदलत जाईल तसा त्यातही नवीन तंत्रज्ञान येणारच आहे. तंत्रज्ञान रोजच बदलत राहणार आहे आपल्याला या तंत्रज्ञानाच्या किती आहारी जायचं आहे हे आता ठरवावं लागणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक पद्धतीने केला तर त्याचे परिणामही सकारात्मक होत असतात एआय हे त्याचंच उदाहरण आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे.

 


========================================================