- स्वप्ना हरळकर/ अविरत वाटचाल
- नवी मुंबई, 7 जुलै 2024
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी नुकतीच एका महापालिका शाळेला अचानक भेट दिली. या भेटीबद्दल आयुक्तांचे आभार. नवी मुंबईच नव्हे तर राज्यभरातल्या नागरिकांनी आयुक्तांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. महापालिकेच्या 80 शाळांमध्ये जर आयुक्तांनी भेट दिली तर खूप बदल दिसून येतील एवढे नक्की. पण शाळा तपासत राहणे हे त्यांचं काम नाही. त्यासाठी शिक्षण उपआयुक्त, शिक्षण अधिकारी, केंद्र संचालक असतात. यातल्या एकाने जरी आपले काम नियमाप्रमाणे केलं नाही तर हे परिणाम दिसून येतात.

या भेटीदरम्यान आयुक्तांना मध्यान्ह भोजन, शाळा स्वच्छता, शाळेच्या वेळापत्रकाचे नियोजन याबाबत केलेली तपासणी अनपेक्षित होती. आयुक्तांची ही भेट जशी इतरांसाठी धक्कादायक होती तशीच ती महापालिका प्रशासनासाठीही नक्कीच धक्कादायक असणार आहे. अचानक भेट दिल्याने अनेक गोष्टींचा उलगडा झाला असला तरी इतकी ढिलाई होत असल्याचे वास्तव मात्र समोर आले आहे. महापालिका शाळांमधे शिकणारी मुलं म्हणजे गरीब घरातली मुलं मग त्यांना सोयीसुविधा कशासाठी द्यायच्या असा एक विचारप्रवाह असतो. अर्थात नवी मुंबई महापालिकेने सीबीएसई शाळा उभारून शैक्षणिक क्षेत्रात नवीन प्रगती केली आहे. मात्र सीबीएसई वगळता इतर शाळांमधे अजून खूप बदल होणे आवश्यक आहे हेच या भेटीतून समोर आले.

विद्यार्थी हा जर मेहनती असेल तर तो कुठेही चमकतो हे खरं आहे मात्र त्यालाही योग्य मार्गदर्शनाची गरज असते. पालिका शाळेतील काही शिक्षक हे काम निष्ठेने करत असतील मात्र इतर शिक्षकांचोही मूल्यमापन व्हावे. विद्यार्थी परिक्षा देतात तशीच परिक्षा शिक्षकांची व्हावी म्हणजे शिक्षक अधिक अभ्यास करतील आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल.
महापालिका शाळेतली मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा शाळेच्या बाहेर दिसणारं चित्र विचित्र आहे. काही मुलं युनिफॉर्म मध्ये काही साध्या कपड्यात, काहींच्या पायात चपला असतात काहींच्या पायात नसतात. वर्षाच्या सुरुवातीला नवीन युनिफॉर्म, चपला वापरणाऱ्या मुलांकडे पाहून या मुलांना काय वाटतं असेल याचा विचार शिक्षण विभाग कधी करणार आहे. या मुलांना हा आनंद मिळू शकत नाही याला विद्यार्थी, पालक की शिक्षण विभाग जबाबदार आहे याचा विचारही व्हायला हवा.
महापालिका आयुक्तांनी भेट दिली असता शाळांमध्ये स्वच्छता गृह आणि स्वच्छता पुरेशी नसल्याचं समोर आलं. स्वच्छतेचा बाबतीत राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या पालिकेला स्वत:च्याच मालकीच्या शाळांमधे स्वच्छता करण्याचा विसर पडला की काय असं वाटू लागलं आहे. शिक्षणाधिकारी आ़णि संबंधित अधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष करावं इतकी ही सोपी गोष्ट नाही. इकीकडे शहरात टॉयलेट उभारणारी ते स्वच्छ राहावेत याची काळजी घेणारी पालिका मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत इतकी असंवेदनशील बनली आहे याबाबत दुख: आहे. जवळपास पाच तास शाळेत जाणारा एखादा विद्यार्थी या अस्वच्छतेमुळे नैसर्गिक विधी रोखून धरत असेल तर त्याच्या आरोग्यावर याचे किती गंभीर परिणाम होवू शकतात याची जाणीव असणे आवश्यक आहे.

एकीकडे पालिका स्वच्छ अभियान राबवत शहरातला कचरा जमा करून त्यापासून वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यावर भर देत आहे ज्याची दखल राज्य पातळीवरच नव्हे तर संपूर्ण देशात घेतली जाते आणि दुसरीकडे शाळांमधे अस्वच्छता दिसून येते. हा विरोधाभास महापालिकेचे मान सन्मान कमी करणारा आहे. यासाठी जबाबदार असणाऱ्या शिक्षकांनाच नव्हे तर अगदी वरिष्ठ अधिकारी यांनाही याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्याची गरज आहे.

मुलांचं पोट भरलेले असले तर अभ्यास लक्षात राहतो आणि वर्गात मन एकाग्र राहते ही बाब आयुक्तांच्या लक्षात आहे त्यामुळेच मध्यान्ह भोजनाची चव चाखली गेली. लहान लेकरांना खायला देणार आहोत याचा विचार करून तरी अन्नाचा दर्जा राखला जावा. हा दर्जा राखण्यासाठी कायमस्वरूपी एखादा अधिकारी असावा. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महापालिका शाळांमधे किमान सुविधांची वानवा असावी हे नवी मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेचे अपयश आहे.
========================================================

========================================================


========================================================
EDIT : निसर्ग समजून घ्यावाच लागेल













