शेतकरी मोडला तर राज्य मोडेल

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा इशारा

मुंबई, 8 मार्च 2017/AV News Bureau:

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनिय असून शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी दिली नाही तर शेतकरी मोडून पडेल आणि शेतकरी मोडला तर राज्य मोडेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत दिला.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांना पाहून  राजिनामे कुठे गेले, अशा घोषणाही विरोधी सदस्यांनी केल्या.

मुख्यमंत्र्यांनी योग्यवेळी शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याचे जाहीर केले. परंतु ही मदत शेतकरी नष्ट झाल्यावर देणार का, असा टोला अजित पवार यांनी मांडला. सरकार जाहिरातींवर खर्च करते. मात्र शेतकऱ्यांना मदत देण्यास वेळकाढूपणा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने कर्जमाफीचा निर्णय घ्यावा,अशी सर्वपक्षांतर्फे मागणी करीत असल्याचे पवार यांनी सांगितले.

दरम्यान, शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी या मागणीसाठी विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला.