राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवा

राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षांचे निर्देश

 मुंबई,28 एप्रिल 2017/AV News Bureau:

मुंबई व ठाण्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या तातडीने सोडवा, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्माचारी आयोगाने आज राज्य सरकारला दिले. यासंदर्भात आज राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेतली.

 आयोगाचे अध्यक्ष मनहर वालजीभाई जाला, सदस्य मंजू दलेर, दिलीप हातीबेड यांच्यासह राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामू पवार, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव विजय सतबीर सिंग, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, आयोगाचे सचिव नारायण दास, उपसंचालक वरिंदर सिंग, ॲड. कैलाश वाघमारे, विनायक भारती, विजय हारकर, प्रेम खोटे, जिग्नेश जाला यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी, विविध सफाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

सफाई कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे, कंत्राटी पद्धतीमध्येही सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश करणे, जात प्रमाणपत्राच्या संदर्भातील अडचणी आदी विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच विविध संघटनांच्या प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचा सफाई कर्मचारी हा कणा आहे. या मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांनी योगदान द्यावे. लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार सफाई कर्मचाऱ्यांना सुविधा देण्यात याव्यात. तसेच शिक्षण घेतलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी. तसेच महानगरपालिकांमधील सफाई कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदावर वाल्मिकी समाजातील युवकांना घेण्यात यावे, असे जाला म्हणाले.

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांसंदर्भात तातडीने उपाय शोधण्यात यावेत. तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारामध्ये वाल्मिकी समाजातील नागरिकांचाही समावेश करण्याची सूचना   श्रीमती दलेर यांनी केली.

सफाई कर्मचारी हे वारसा हक्काने नोकरीत लागलेले असतात. त्यामुळे त्यांना जात पडताळणीसाठी पन्नास वर्षापूर्वीच्या वास्तव्याच्या पुराव्याची अट शिथिल करावी, असे हातीबेड यांनी यावेळी सांगितले.