स्ट्रॉबेरीचे गाव होणार आता पुस्तकांचेही गाव

महाराष्ट्रात साकारतंय भारतातील पहिलं पुस्तकांचं गाव’-

मुंबई,28 एप्रिल 2017/AV News Bureau:

सातारा जिल्ह्यातील भिलार हे गाव स्ट्रॉबेरीसाठी प्रसिध्द आहे. आता या गावाची ओळख पुस्तकांचे गाव म्हणूनही होणार आहे. सुमारे 25 साहित्यप्रकारांचा समावेश असलेली तब्बल 15 हजार पुस्तके या गावामध्ये वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देशातील पहिल्या वहिल्या पुस्तकांच्या गावाचे उद्घाटन 4 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.

भिलार येथील पुस्तकांचे गाव नेमके कसे असेल याबाबतची माहिती मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी दिली.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेले भिलार हे गाव पुस्तकांचं गाव म्हणून रुपांतरित होत आहे. पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यावर पाचगणीपासून सुमारे ५ कि.मी. अंतरावर भिलार गाव आहे. प्रत्येक ठिकाणी सुमारे ४०० ते ४५० अशी एकूण सुमारे १५,००० पुस्तके वाचकांसाठी गावात उपलब्ध आहेत. शासनाच्या वतीने प्रत्येक ठिकाणी कपाट, टेबल, टी-पॉय, खुर्च्या, सुशोभित छत्री, बिन बॅग इत्यादी वस्तूही पुरवण्यात आल्या आहेत. पर्यटक किंवा रसिक-वाचक घरांमध्ये जाऊन निवांत वाचन करु शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रकल्पात सहभागी असलेल्या २५ ठिकाणांचे (घरे व सार्वजनिक जागा) सुसज्ज व सुंदर ग्रंथालयांत रुपांतर करण्यात आले आहे. पर्यायाने, संपूर्ण भिलार गावच एक ग्रंथालय बनले आहे. भिलारवासीयांनी राज्य शासनाच्या पुढाकाराला सकारात्मक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने निसर्गरम्य असलेल्या गावात स्वत्व या स्वयंसेवी गटाच्या सुमारे ७५ चित्रकारांनी गावातील २५ ठिकाणे आपल्या कलेच्या माध्यमातून सजवली आहेत. तर एशियन पेंट्स कंपनीनेही मदत केली आहे.

  • 25 साहित्यप्रकार वाचण्याची संधी

घरे, लॉजेस्, मंदिरे आणि शाळा अशा एकूण २५ ठिकाणी  कथा, कविता, कादंबरी, संत साहित्य, स्त्री-साहित्य, बालसाहित्य, इतिहास निसर्ग-पर्यावरण-पर्यटन, लोकसाहित्य, चरित्रे-आत्मचरित्रे, दिवाळी अंक अशा विविध 25 साहित्य प्रकारची पुस्तके ठेवण्यात आले  आहेत. यामुळे एकाच ठिकाणी 25 साहित्यप्रकार वाचण्याची संधी वाचकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख  साहित्यिक, लोकअभ्यासक यांची माहिती देणारे 50 साहित्यिक प्रदर्शनीही येथे असणार आहे.

  • शाळांनी येथे शैक्षणिक सहल आणावी

पुस्तकांचे गाव नेमके काय आहे हे शाळेतील मुलांनाही कळावे यासाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळेची शैक्षणिक सहल येथे असावी असे आवाहन शाळांना करण्यात येणार आहे. यामागे विदयाथर्यांना किमान 1 ते 2 दिवस पुस्तकांच्या सान्निध्यात घालविण्याची संधी मिळावी हा उद्देश आहे. आजच्या तरुण पिढीला आपली साहित्य संस्कृती किती संपन्न आहे हे कळावी यासाठी हा प्रयत्न करण्यात येणार आहे.

  • साहित्य महोत्सव आयोजित करणार

शालेय विद्यार्थ्यांना असलेली दिवाळी, नाताळ आणि मे महिन्याची उन्हाळी सुटटी लक्षात घेऊन येथे साहित्य महोत्सव आयोजित केले जाणार आहेत. याचबरोबर वाचन, लेखन, प्रकाशन आणि प्रशिक्षण कार्यशाळा, पुस्तक प्रकाशने, काव्यवाचन, अभिवाचन आणि साहित्यिक गप्पा अशा विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे.