शेतकऱ्यांनी सामुदायिक शेतीचा पर्याय स्वीकारावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बुलडाणा,6 मे 2017AV News Bureau:

शेतीच्या छोट्या-छोट्या तुकड्यांमुळे शेतीची सुधारणा आणि गुंतवणूक करणे शक्य नाही. त्यामुळे राज्य शासन सामुदायिक शेतीचा प्रकल्प अंमलात आणत आहे.  हा  प्रयोग यशस्वीपणे राबविल्यास पहिल्याच वर्षी शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्न मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमत्र्यांनी आज  गाडेगाव (बु.) येथील शेततळ्याची पाहणी केली. त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या.

सामुदायिक शेतीसाठी किमान 20 शेतकरी आणि 100 एकर शेती असणे आवश्यक आहे. या एकत्रित झालेल्या सर्व शेतीमध्ये राज्य शासनाच्या सर्व योजना एकत्रितरित्या राबविण्यात येणार आहेत. ठिबक सिंचन, शेडनेट, फळबागा अशा विविध योजनांच्या माध्यमातून 50 लाख रूपयांची गुंतवणूक या सामुदायिक शेतीमध्ये होणार आहे. शेतीतील गुंतवणुकीमुळे भविष्यात शेतीचे उत्पन्न चार पट वाढविणे शक्य आहे. हा प्रयोग यशस्वीरित्या राबविल्यास पहिल्याच वर्षी शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्न मिळेल. त्यामुळे जळगाव जमोद तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

जळगाव जामोद तालुक्यातील सुमारे 45 गावे खारपाण पट्ट्यात येत आहे. या खारपाण पट्टयातील जमिनीची सुधारणा करण्यासाठी नागरिकांनी विनंती केली. त्यावर  खारपाण पट्ट्यातील जमिनीची सुधारणा करण्यासाठी ‘शेततळे’ हा चांगला पर्याय आहे. या पट्ट्यातील नागरिकांनी शेततळ्यांसाठी एकत्रितरित्या समोर येण्याचे आवाहन मुख्यमत्र्यांनी केले.

  • खारपाण पट्ट्यातील शेतीसाठी पाच हजार कोटी

खारपाण पट्ट्यातील शेतीला डार्क झोनमधून काढून शेतीची सुपिकता वाढविण्यावर राज्य शासन भर देत आहे. कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून खारपाण पट्ट्यातील मातीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी पाच हजार कोटी रूपयांचा प्रकल्प राज्य शासनाने हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जमिनीचा पोत सुधारून शेतकऱ्यांना व्यवस्थित शेती करता यावी, यासाठी प्रयत्न केले जातील,असे फडणवीस यांनी सांगितले.