मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार

मुंबई, 25 नोव्हेंबर 2017/Avirat Vaatchal News Bureau:

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या दुरावस्थेबाबत प्रशासनाला जाग आणण्यासाठी या महामार्गावर पनवेल ते सावंतवाडी दरम्यान 27 नोव्हेंबर रोजी काँग्रेसच्यावतीने 11  ठिकाणी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे.

मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते भाई जगताप यांनी सांगितले की, मुंबई-गोवा महामार्ग सध्या मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या महामार्गावर अपघात होऊन दरवर्षी जवळपास १००० प्रवासी मृत्यूमुखी पडतात. या महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या पहिल्या टप्प्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. त्याचप्रमाणे दुस-या टप्प्याचे जमीन अधिग्रहणाचे काम ही व्यवस्थित सुरु नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. ज्यांची जमीन, घरे व दुकाने उध्वस्त होत आहेत त्यांना दिला जाणारा मोबदला समान न्यायाने न देता कमी जास्त रक्कम देऊन अन्याय केला जात आहे , असा आरोप  जगताप यांनी केला.

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे दुरुस्तीचे कंत्राट मिळालेले कंत्राटदार व अधिका-यांच्या संगनमताने  खड्डे दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधींचा भ्रष्टाचार सुरु आहे. काँग्रेस पक्षाने वारंवार याचा पाठपुरावा केला पण  राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदर महामार्गाच्या दुरुस्तीचे काम आमच्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगत हात झटकले. त्यामुळे सरकारला व प्रशासनास जाग आणण्यासाठी काँग्रेसच्या वतीने २७ नोव्हेंबर रोजी पनवेल ते सावंतवाडी दरम्यान ११ ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.