सध्या भाजपाच्या ओहोटीचे दिवस सुरु झाले

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांची टीका

राज्यातील काही शहरातील नगरपालिकांच्या पोटनिवडणूका झाल्या त्यामध्ये एकाही ठिकाणी भाजप निवडणूक जिंकली नाही.कुठे गेले अच्छे दिन असा सवाल करतानाच जशी भरती येत असते तशी ओहोटीही येत असते.सध्या भाजपाच्या ओहोटीचे दिवस सुरु झाल्याचा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  अजित पवार यांनी कोरेगावच्या जाहीर सभेत भाजपवर केला.

देशाचे पंतप्रधान मोदीसाहेब म्हणतात मी फकीर आहे.अहो तुम्ही फकीर आहात म्हणून काय आम्ही ही फकीर व्हायचं का? असा प्रश्न करतानाच आज देशात हुकुमशाही सुरु आहे.लोकशाहीचा खून पडतोय. पत्रकारांनी २-३ बातम्या चुकीच्या दिल्या तर त्यांची लगेच पत्रकारिता रद्द .असं कधी झालं होतं का ? असा सवालही पवार यांनी विचारला.

मै न खाऊंगा ना खाने दूंगा असं म्हणणाऱ्या मोदींच्या राज्यात नीरव मोदी,चोकशी,विजय मल्ल्या, परदेशात पैसा घेवून गेले. कसे गेले?.मोदी महत्वाचे विषय बाजुला ठेवतात आणि चाय पे चर्चा आणि मन की बात मध्ये येतात आणि सर्वांचे लक्ष वितलित करतात असेही पवार म्हणाले.

या देशाचा कृषीमंत्री कोण आहे हे शेतकऱ्यांना माहित नाही. त्यामुळेच या देशाचा कृषीमंत्री दाखवा आणि हजार रुपयांचे बक्षिस मिळवा असे आवाहन पवार यांनी केले.