पालकांनी शाळेत जाण्यास मनाई केल्यामुळे रागात घर सोडलेल्या 5 मुलींना दिल्लीतून परत आणण्यात पोलिसांना यश

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 18  फेब्रुवारी 2024

शाळेत जाण्यास पालकांनी मनाई केल्याचा राग मनात धरून तळोजा इथल्या घरातून निघून गेलेल्या पाच मुलींना शोधण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. या मुलींना गुडगाव, हरियाणातून परत आणले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिया रामविलास चव्हाण (16) आणि तिची बहीण संतोषी (14) 3 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या आणि पुन्हा घरी आल्याच नाहीत, त्यानंतर आईवडिलांनी तळोजा 1 मध्ये या मुलींचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी मुलीच्या मैत्रिणी तमन्ना मिरहसन अन्सारी (१४ वर्ष), मरीयम मिरहसन अन्सारी (७वर्ष), अलिजा मिरहसन अन्सारी (५ वर्ष) या मुलीही हरवल्या असल्याचं त्यांच्या लक्षात आले. त्यावरून मुलीच्या आईने तळोजा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हयाचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, पोनि गवळी, कक्ष २, पोनि मुलानी, कक्ष ३ तसेच इतर अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी तपास पथके तयार करण्यात आली.

या गुन्ह्याचा तपास करत असताना तांत्रिक तपासात प्रिया ही गुडगांव, दिल्ली येथे असल्याचे समजले त्यानुसार तमन्ना मिरहसन अन्सारी हिचा मानलेला भाऊ आरिफ याच्याशी संपर्क साधून या पाचही  मुलींना गुडगांव, दिल्ली येथुन सुखरूप ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

बातमी वाचा : फूलकिडीच्या (थ्रिप्स) प्रादुर्भावामुळे यंदा हापूस आंबा संकटात

मुलीकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की, तमन्ना हिला तिचे आई वडील शाळा शिकू देत नव्हते व भाजीपाल्याचा व्यवसाय करण्यासाठी मारहाण करत होते. तसेच तिच्या दोन लहान बहिणी मरीयम, आलिजा या दोघीना शिकण्याची आवड असूनही त्यांना देखिल शाळेत पाठवत नव्हते याचा राग धरून तिने पैसे जमवले आणि घर सोडून जाण्यासाठी एका महिन्यापासून प्रयत्न करत होती. तिच्या सात बहिणींपैकी ती दोघींना ती सोबत घेवून गेली होती. त्या घर सोडून जात असताना त्यांना रस्त्यामध्ये भेटलेल्या त्यांच्या शेजारी राहणा-या प्रिया, संतोषी यांना तिने घर सोडण्याचे कारण सांगितले. त्यावर त्या देखील घर सोडण्यासाठी तयार झाल्या आणि या 5 मुलींनी घर सोडले.

बातमी वाचा : मनसेने व्हायरल केला अजित पवारांचा ‘तो’ व्हिडिओ

घर सोडल्यानंतर तळोजा येथून ऑटो रिक्षाने खारघर रेल्वे स्टेशन येथे व नंतर बांद्रा रेल्वे स्टेशन येथून रेल्वेने गुडगांव दिल्ली येथे तमन्ना मिरहसन अन्सारी हिचा मानलेला भाऊ आरिफ याच्याकडे गेल्या. याबाबत आरिफ यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची तकार नसल्याचे या मुलींना सांगितले. शिक्षण घेण्यासाठी घर सोडले असून कोणीही अपहरण केले नसल्याचे प्राथमिक तपासामध्ये सिध्द झाले आहे.

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सह आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, सहा.पोलीस आयुक्त, अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनिरी/ पृथ्वीराज घोरपडे, मसपोनि निलम पवार, पोउपनिरी/शरद भरगुडे, पोहवा/विजय चौधरी, पोशि/महेन्द्र ठाकुर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

========================================================

========================================================

========================================================