“आमची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण आहे” – भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मुंबई, 8 जून 2025

भारत निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला २४ डिसेंबर २०२४ रोजी सविस्तर उत्तर पाठवले असून, त्यात त्यांच्या उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर स्पष्ट आणि तपशीलवार स्पष्टीकरण दिले आहे. या अधिकृत पत्रव्यवहारानंतरही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांद्वारे पुन्हा शंका आणि आरोप मांडल्याने आयोगाने याबाबत खेद व्यक्त केला आहे.

आयोगाने म्हटले आहे की, “निवडणूक आयोग एक स्वतंत्र आणि संविधानिक संस्था आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा त्याच्या नेत्याने आयोगाशी थेट पत्राद्वारे संपर्क साधल्यास, आम्ही निश्चितच उत्तर देतो आणि देत आलो आहोत.”

राहुल गांधी यांनी थेट आयोगाशी संवाद साधण्याऐवजी वारंवार माध्यमांतून आरोप करणे हे आश्चर्यकारक आणि खेदजनक असल्याचे आयोगाचे मत आहे. त्यांनी माध्यमांमध्ये प्रश्न उपस्थित करण्याऐवजी थेट निवडणूक आयोगाशी पत्राद्वारे संपर्क साधावा, अशी अपेक्षा आयोगाने व्यक्त केली आहे.

“निवडणूक आयोगाकडे विचारलेल्या अधिकृत प्रश्नांना उत्तर देण्याची आमची प्रक्रिया पारदर्शक आणि ठोस आहे,” असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

हा संवाद माध्यमांमधून न करता थेट आयोगाशी केल्यास, लोकशाही प्रक्रियेस अधिक बळकटी मिळेल आणि संवाद अधिक परिणामकारक ठरेल, असे भारत निवडणूक आयोगाने सांगितले आहे.