दारूची दुकाने गावाबाहेरच , अन्यथा परवाना रद्द

मुंबई, 23नोव्हेंबर 2016/AV News Bureau :

ग्रामसभेने साध्या बहुमताने ठराव संमत केल्यास गावातील मद्य विक्री दुकानाचे गावाबाहेर 100 मीटर अंतरावर स्थलांतरित केली जाईल. स्थलांतरणाची ही कार्यवाही एका वर्षाच्या आत न केल्यास संबंधित दुकानाचा परवाना कायमस्वरुपी रद्द होईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे.

मुंबई दारुबंदी (ग्रामसभा ठराव पारित केल्यामुळे अथवा नगरपरिषद / महानगरपालिकेच्या वॉर्डातील मतदारांनी निवेदन दिल्यामुळे परवाना बंद करणे) आदेश,  2008 च्या तरतुदीनुसार ग्रामीण भागात ग्रामसभा घेऊन ठरावान्वये मद्य विक्री परवाना बंद करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु,  ग्रामीण भागात बरीच दारूची दुकाने ही वस्तीच्या ठिकाणी सुरू असतात. त्यामुळे महिला, लहान मुले यांना त्रास सहन करावा लागतो. अशा दारू विक्री दुकानांमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत असल्याचे आढळून आले आहे. यापार्श्वभूमीवर 2008 च्या उपरोक्त आदेशात सुधारणा करुन ज्या दारू विक्री दुकानांमुळे सामान्य नागरीकास त्रास होतो, अशी दुकाने लोकवस्तीच्या बाहेर स्थलांतरीत केले जातील. तसेच जिथे 10 पेक्षा कमी राहती घरे असतील त्यापासून 100 मीटर अंतरावर दारू विक्री दुकाने स्थलांतर करण्याचे निर्देश देण्याबाबत ग्रामसभेस हक्क देण्यात आले आहेत. यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मतदारांपैकी 50 टक्केपेक्षा कमी नसलेल्या मतदारांनी ग्रामसभेत उपस्थित राहून साध्या बहुमताने ठराव मंजूर केल्यास अशी दुकाने लोकवस्तीच्या बाहेर स्थलांतर करणे  बंधनकारक राहील, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

  • अवैध दारुविक्रीप्रकरणी 9 हजार 469 जणांना अटक

अवैध तसेच बनावट दारुविक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठ्या प्रमाणात कार्यवाही हाती घेतली आहे. त्यानुसार एप्रिल ते ऑक्टोबर 2016 या सहा महिन्यांच्या कालावधीत राज्यात एकूण 16 हजार 685 गुन्हे नोंदविण्यात आले. गतवर्षी याच कालावधीत 15 हजार 88 इतके गुन्हे नोंदविण्यात आले होते.  गतवर्षीच्या तुलनेत यंदा ही वाढ 10.58 टक्के इतकी आहे. एप्रिल ते ऑक्टोबर 2016 या कालावधीत एकूण 9 हजार 469 इसमांना अटक करण्यात आली आहे. गतवर्षी या कालावधीत 7 हजार 307 इसमांना अटक केली होती. ही वाढ 29.59 टक्के इतकी आहे. एप्रिल ते ऑक्टोबर 2016 या कालावधीत एकूण 44 हजार 740 लिटर ताडी जप्त केली आहे. गतवर्षी या कालावधीत 22 हजार 285 लिटर ताडी जप्त केली होती. ही वाढ 100.76 टक्के इतकी आहे. एप्रिल ते ऑक्टोबर 2016 या कालावधीत एकूण 487 वाहने जप्त केली आहेत. गतवर्षी या कालावधीत 420 वाहने जप्त केली होती. ही वाढ 15.95 टक्के इतकी आहे. एप्रिल ते ऑक्टोबर 2016 या कालावधीत जप्त मुद्देमालाची एकूण किंमत रु. 19.83 कोटी इतकी आहे. गतवर्षी या कालावधीत ती किंमत रु. 16.31 कोटी इतकी होती. ही वाढ 21.56 टक्के इतकी आहे.

  • अवैध मद्य निर्मिती व विक्री रोखण्यासाठी व्हॉट्स-ॲप क्रमांक

या विभागामार्फत अवैध मद्य निर्मिती व विक्री केंद्राची माहिती द्यावी म्हणून टोल फ्री क्रमांक – 18008333333 व व्हॉट्स-ॲप क्रमांक 8422001133 प्रसिध्द करण्यात आला. त्यावर आतापर्यंत एकूण 1609 तक्रारी प्राप्त आहेत. त्यापैकी 1176 (73 टक्के)  तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे, अशी माहितीही मंत्री  बावनकुळे यांनी यावेळी दिली. 22 नोव्हेंबर रोजी झालेल्या या पत्रकार परिषदेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त व्ही. राधा उपस्थित होते.