“षडयंत्र” पुन्हा रंगभूमीवर

 मुंबई, 10 एप्रिल 2017/AV News Bureau:

नाटककार सुरेश जयराम हयांचं १९९० साली गाजलेलं “षड्यंत्र” हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. प्रकाश बुद्धीसागर दिग्दर्शित, अभिनेते चंदू पारखी, रमेश भाटकर, डॉ. गिरीश ओक, सविता प्रभूणे, प्रमोदीनी कदम, सुजाता कानगो, संदीप मेहता अभिनीत हया नाटकाने त्याकाळी प्रचंड लोकप्रियता मिळविली होती. जवळ जवळ २७ वर्षांनंतर हे नाटक पुन्हा आताच्या दिग्दर्शक व कलावंतांसोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अनिषा क्रिएशन्स निर्मित व मल्हार प्रकाशित, निर्माते मिलिंद मोरे आणि अभिनेता सुचित जाधव “षड्यंत्र” या रहस्यमय, थरारक नाटकाची निर्मिती करीत आहेत. अभिनेता – दिग्दर्शक अरुण नलावडे या नाटकाचं दिग्दर्शन करीत असून अभिनेत्री सिया पाटील, सुचित जाधव, सुदेश म्हशीलकर आणि रमेश भाटकर यांच्या प्रमुख भुमिका आहेत. हया नाटकाची तालीम सध्या जोरात सुरू असून शुभारंभाचा प्रयोग दि. २१ एप्रिल रोजी उस्मानाबाद येथे होणार्‍या ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये होणार आहे.

“षडयंत्र” हे नाटक एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरात मिळकतीसाठी होणारा संघर्ष व त्यातून होणारे खून, एकमेकांवर होणारी कुरघोडी, अशा गुंतागुंतीच्या कथानकावर आधारित आहे. या नाटकात ऋषीकेश दळी, केवलानंद बर्वे, वासंतिका वाळके, प्रगती घाणेकर, माधुरी जोशी, देवेंद्र वाघमारे, यांच्याही भूमिका आहेत. या नाटकाचे नेपथ्य प्रकाश मयेकर, संगीत प्रबोध शेटये, वेशभूषा पुर्णिमा ओक, प्रकाश योजना राजन ताम्हणे यांची असून सुत्रधार संतोष शिदम आहे.