मुख्यमंत्र्यांनी आरोप करण्यापेक्षा आत्मचिंतन करावे

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण

मुंबई, 2 जून 2017/AV News Bureau:

मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर बेछूट आणि बेजबाबदार आरोप करण्यापेक्षा शेतक-यांचा सरकारवरचा विश्वास का उडाला ? त्यांच्यावर संप करण्याची वेळ का आली?  याचे आत्मचिंतन करावे, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मारला आहे.

राज्यातले शेतकरी संपावर गेल्यामुळे राज्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्जमाफीसाठी शेतक-यांनी स्वयंस्फूर्तपणे सुरु केलेल्या या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. संपकरी शेतक-यांच्या मागण्यांवर तात्काळ निर्णय घेणे अपेक्षित असताना मुख्यमंत्री मात्र  “शेतक-यांच्या संपाच्या आड विरोधी पक्ष हिंसा करित आहेत” असे बेछूट आणि बेजबाबदार आरोप करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी असे आरोप करून विरोधकांवर नाही तर शेतक-यांच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची टीका चव्हाण यांनी केली.

विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेला राज्यभरातील शेतक-यांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादावरून सरकारने शेतक-यांचा विश्वास गमावला आहे हे स्पष्ट झाले होते. संघर्ष यात्रेला मिळालेल्या प्रतिसादामुळे पायाखालची वाळू घसरल्यानेच भाजपने शिवार संवाद यात्रा काढण्याची घोषणा केली. वारंवार मागण्या करूनही सरकार कर्जमाफीबाबत काहीच निर्णय घेत नसल्याने शेवटी शेतक-यांवर संप करण्याची वेळ आली आहे. सरकारनेच शेतक-यांवर ही वेळ आणली असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली.