भारनियमन व कोळशाचा जाब येत्या अधिवेशनात विचारणार

  • माजी उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपुर, 14 ऑक्टोबर 2017:

निवडणुकीच्या आधी भाजपने दिलेली आश्वासने आणि मागच्या साडे तीन वर्षांतील वाटचाल पाहिली तर लक्षात येते की भाजपला कमालीचे अपयश आलेले आहे. भारनियमन ही कृत्रिम विजेची टंचाई आहे. आम्ही उर्जा मंत्री असताना एप्रिल, मे मधेच कोळसा भरायचो. पाऊस पडल्यानंतर अनेक अडचणी निर्माण होतात. सरकारने कोळसा का भरला नाही? हे कळायला मार्ग नाही. आताचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हे अपयश आहे. भारनियमन आणि कोळशाचा जाब येत्या अधिवेशनात आम्ही विचारणार आहोत, असे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सांगितले. ajit pawar on loadsheding issue

नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर तसेच ग्रामीण कार्यकारिणीच्या आढावा बैठकीचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते.त्यानंतर पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

दोन हजार मेगावॅटचा शॉर्टफॉल असल्याची माहिती काही अधिकाऱ्यांनी मला दिली. इतका मोठा शॉर्टफॉल असेल तर जनता अंधारात जाईल. कोळसा पुरविणे महानिर्मितीचे काम आहे. इतकं होत असताना मुख्यमंत्री काय करत होते, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. ajit pawar on loadsheding issue

ते पुढे म्हणाले की वन नेशन, वन टॅक्स याला कुणाचाच विरोध नाही. युपीएच्या काळात ५ ते १८ टक्के पर्यंत जीएसटी लावायचा आमचा विचार होता. ज्या लोकांनी तेव्हा विरोध केला त्यांनीच जीएसटी आता लादला. नुसताच लादला नाही तर तो २८ टक्क्यांपर्यंत वाढवला सुद्धा. ८९ लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असल्याचे आधी सरकारने सांगितले होते. आता फायनल कर्जमाफी ६९ लाख शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे कळत आहे. मग २० लाख शेतकरी गेले कुठे? हा आमचा सरकारला सवाल आहे.

ज्या औषधामुळे यवतमाळ येथे शेतकरी मरण पावले त्याला कारणीभूत असणाऱ्या लोकांवर, ज्यांनी विषारी औषध निर्माण केले त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. आता कुणावर ३०२ दाखल करणार असा प्रश्नही त्यांनी विचारला.