करावे गावात स्कूल बसेस पेटवल्या

नवी मुंबई, 15 ऑक्टोबर 2017/AV News Bureau:

नेरुळ येथील करावे गावात उभ्या असलेल्या शाळेच्या सहा बसेस पेटवून दिल्याची घटना रविवारी पहाटे 4 च्या सुमारास घडली. या घटनेत पेटवून दिलेल्या बसेस भस्मसात झाल्या असून सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झालेले नाही. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

करावे गाव सेक्टर 36 मधील ज्ञानदीप शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात शाळेच्या बसेस उभ्या असतात. रविवारी पहाटे 4 च्या सुमारास शाळेच्या सहा बसेस पेटल्याची माहिती नेरूळ अग्निशमन दलाला मिळाली. माहिती मिळताच अग्निशन दलाच्या बंबांनी घटनास्थळी जावून आग आटोक्यात आणली. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती नेरुळ अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.या बसेस पोद्दार शाळेच्या असल्याची प्राथमिक माहिती समजते.