राहुल गांधीजींच्या वाढदिवसानिमित्त ५ लाख गरजूंना जेवणाच्या पाकिटांचे व अन्नधान्य कीटचे वाटप

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती
  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, १९ जून २०२०

देशात कोरोनामुळे असलेली गंभीर परिस्थिती आणि चीन सीमेवर आपले २० जवान शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार राहुल गांधी यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातही कोणताच जाहीर कार्यक्रम न करता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने गरजूंना मदत करून राहूल गांधी यांचा वाढदिवस साजरा केला, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

संगमनेर येथील कार्यक्रमात बोलताना थोरात म्हणाले की, देशात व राज्यात कोरोना आणि चीनच्या कारवाया असे दुहेरी संकट उभे ठाकले आहे. नागरिकांच्या सर्वोच्च हिताला प्राधान्य देत काँग्रेसने कायम देशासाठी काम केले आहे. राहुल गांधी यांचा वाढदिवस साधेपणाने व विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा केला. काँग्रेसच्या वतीने राज्यभरात ५ लाख गरजू गरिबांना तयार जेवण आणि अन्नधान्य कीट्सचे वाटप, ५ लाख नागरिकांना मास्कचे वाटप केले. राज्यभरात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ५ हजार कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. तसेच राज्यभरातील कोरोना संकटात लढणाऱ्या योद्धयांना पीपीई कीट, सॅनिटायझरचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. संगमनेर येथील कार्यक्रमाला आमदार डॉ. सुधीर तांबे,  ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ,  यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

अमरावती येथील रक्तदान शिबिरात महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी रक्तदान केले तर बुलढाण्यात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी चिखली येथे रक्तदान केले. नांदेड येथील कार्यक्रमात आ. अमर राजूरकर, आ. मोहनराव हंबर्डे, माजी मंत्री. डी. पी. सावंत यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांना पीपीई कीटचे वाटप करण्यात आले.  चंद्रपूर  जिल्ह्यात वरोराच्या आमदार सौ.प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते जीवनावश्यक कीटचे वाटप करण्यात आले. औरंगाबाद, नाशिक, पुणे, कोल्हापूर, लातूर, सोलापूर, सांगलीसह राज्यातील विविध भागात तयार जेवण, अन्नधान्य, मास्क सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. पोलीस, डॉक्टर, नर्स या कोरोना योद्ध्यांना PPE कीट देण्यात आले. आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. सफाई कामगार यांचाही सन्मान करण्यात आला. काँग्रेस पक्षाचे मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवा दल, एनएसयुआय या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन्सनीही मोठ्या प्रमाणात गरजूंना मदत केली. या कार्यक्रमाला कसलेही उत्सवी स्वरुप न देता अत्यंत साधेपणाने सामाजिक भान राखत राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

======================================================

इतर बातम्यांचाही मागोवा